सारेगमप अंतिम क्षण…
आता सगळं संपत आलय. शेवटी उशिरा का होइना पण आता तरी कोणालाच बाहेर न घालवल्यामुळे मुलं कशी अगदी समरसुन गाताहेत आणि आपल्याला निर्भेळ आनंद देत आहेत.काल रविवारी सायंकाळचा रिपीट एपिसोड पाहिला आणि जाणवलं.
तरी पण , कुठे तरी चुकलय.. आणि शाल्मली पण ह्या ५ मुलांच्या बरोबर हवी होती असं वाटतं. तसाही जेंव्हा शाल्मलीने व्होट आउट होण्यापुर्वी अवधुत गुप्तेचं गाणं निवडलं होतं , तेंव्हाच जरा मनामधे शंकेची पाल चुक चुकली. आणि नेमकं तेच झालं. शेवटी वन्स मोअर तर मिळाला पण गाणं गायलं ते अवधुत आणी वैशाली ने !कुठलंही गाणं , जेंव्हा ओरिजिनल शी कम्पेअर केलं जातं तेंव्हा, मार्क्स आणि एस एम एस मिळणं जरा कठीणच होतं.
कार्तीकी सुरेल गाते तरी पण व्होट आउट झाली होती. हेच दाखवतं की तुमची सिस्टीम किती चुकिची आहे आणि कमकुवत आहे ते.
अवधुत नेहेमी मुग्धाला ,’ मुग्धा गीतामधुन’ बाहेर निघ म्हणायचा. गेल्या दोन एपिसोड मधली तिची गाणी प्रगल्भतेची साक्ष देतात. शब्द तर इतके कठीण, की, साधे पाठ करुनही लक्षात ठेवणे कठीण. पण ही कार्टी मात्र अगदी लिलया पेलते आणि कुठेही न चुकता किंवा न अडखळता म्हणते..
प्रथमेश तर सुरांचा बादशहाच आहे. प्रत्येक गाणं तेवढ्याच ताकतिने म्हणतॊ. ते दत्ताचं भजन तर आयुष्य़भर हॉंटींग करित रहाणार आहे मला.
आर्या चा आवाज खुपच मधुर आहे. गाण्यात आलाप आणि ताना सुरेख घेते. मला गाणं म्हणता येत नाही पण आर्याचं गाणं ऐकलं की जाणवतं की ही मुलगी अगदी बिनचुक गाते.
सगळीच मुलं इतकं चांगलं गाणं म्हणताहेत की कुणालाही व्होट आउट केलं आणि समजा एकालाच महाविजेता म्हणुन घोषीत केलं तर, इतर ४ मुलांचे चेहेरे मला तरी पहावणार नाहीत. कदाचित डोळ्यातही पाणी येइल, ज्यांचं नंबर १ ला सिलेक्शन झालं नाही त्यांच्या साठी.
मला तो एपीसोड आठवतोय, सगळे स्पर्धक २ ते ६ च्या दरम्यान सापशिडीवर उभे होते. मुग्धा अगदी सगळ्यात कमी आकड्यावर ( मला वाटतं १ किंवा २ असेल) आणी इतर सगळे स्पर्धक सिरियली पुढे उभे होते. मुग्धा चा चेहेरा पाहुन अगदी भरुन येत होतं. मला तर वाटलं की झालं आता जाणार ही बाहेर……
पण नंतर त्याच एपिसोडला डीक्लिअर करण्यात आलं की, कॊणालाही बाहेर काढले जाणार नाही , महा अंतिम फेरी पर्यंत..
ह्या सगळ्यांनीच आपल्याला इतका आनंद दिलेला आहे, की त्यांच्याशी असा खेळ खेळलेला तुम्हाला आवडेल का?
मला असं वाटतं की आता बस्स झालं! कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात सगळ्यांनाच विजेते म्हणुन घोषीत करावे…












