काही लोकं भेटतात, आणि एकदम जवळचे मित्र कधी होऊन जातात तेच कळत नाही. मैत्री होण्यासाठी रोज भेट होणे किंवा रोज फोनवर गप्पा झाल्याच पाहिजे असं नाही. एखादी लहानशी भेट पण पुरेशी ठरते. कामाच्या संदर्भात मध्यंतरी आसामला आणि मेघालयाला गेलो होतो.
माझी कलकत्ता गौहाती फ्लाईट दुपारची होती . पण काही कारणामुळे रिशेड्य़ुल होऊन संध्याकाळी निघाली. रात्री साधारणपणे ९ वाजता गौहाती ला पोहोचलो. एअर पोर्टला मनोज ( डिलर) आला होता. बाहेर हातामधे फुलांचा गुच्छ घेउन उभा. मला तर लाजल्या सारखं झालं.. असा फुलांचा गुच्छ मला फक्त सेंड ऑफ आणि स्वतःच्या लग्नात मिळाला होता.
मनोज! साधारण पणे ३५ वय असेल, तोंडात कलकत्ता पानाचा तोबरा भरलेला, गोरा रंग, आणि लक्षात रहाणारी गोष्ट म्हणजे हसतमुख चेहेरा. हा माणुस अगदी कायम हसत रहायचा. नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही हॉटेल नंदन ला रवाना झालो.
रुमवर पोहोचल्यावर गप्पा सुरू झाल्या . माझी आणि मनोज ची ही काही तशी पहिली भेट नव्हती. दर वर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला किंवा डीलर मिट ला भेट व्हायची. पण इतक्या गडबडीत वैयक्तिक संबंध तयार झाले नव्हते. खरं तर मी वेस्टर्न रीजन चा माणुस, पण केवळ माझा कलकत्याचा काउंटर पार्ट सुटीवर होता , आणि कामाची अर्जन्सी होती ,म्हणून मला तिथे जावं लागलं.
ह्या माणसाची वागणूक खूप सोज्वळ आणि कल्चर्ड ! अगदी जाणवण्या इतकं .. रॉयल चॅलेंज बरोबर गप्पा सुरु झाल्या. म्हंटलं, मनोज भाई, तुम्ही इथे आसाम मधे कधी पासून आलात?
“म्हणाला, माझे वडील इथे आले होते, आणि नंतर इथलेच होऊन राहिले. . पुन्हा एक पुस्ती जोडली, “हम मारवाडी जहां भी जाते है उस जगह कॊ अपना वतन बना लेते है” .
या भागातल्या नक्षल टेररिझम बद्दल बोललो, तर म्हणाला की उल्फा वाले असो किंवा टेररिस्ट असओ , सगळ्यांचा फंडा एकदम एकच आहे, इथला सगळा बिझिनेस हा मारवाडी समाजाच्याच हातात आहे. हे उल्फा वाले एखाद्या गावात जाऊन एखाद्या मारवाड्याला सरळ गोळी मारतात आणि दुसऱ्या दिवशी गावातल्या इतर मारवाडी व्यावसायीकांनाही निरोप पाठवतात, की जर जिवंत रहायचं असेल तर पैसे द्या… पुलिस कुछ कर नही सकती.
असा निरोप आला की आम्ही सगळे जिवाच्या भितीमुळे पैसे देऊन मोकळॆ होतो. हम भी देते है.. “भैया फिअर इज द की”.. पहले आदमी को जब कुछ कहे बगैर गोली मार दी , तो बाकी सब लोग पैसा दे ही देते है.. कोई किडनॅपिंग नही , कोई मारधाड नही. क्लिन गेम.. और हम बिझिनेस मन ही तो इझिएस्ट प्रे है इनके लिये.
थोडा शॉक बसला.. पण सावरलो. इथे लोकल असामी लोक फारच गरीब आहेत आणि खालच्या दर्जाची कामं करतात. थोडे फार लोक सरकारी नौकरी मधे आहेत. पण तशी परिस्थीती गंभीरच आहे. दुसऱ्या दिवशीचा म्हणजे त्याच्या फॅक्टरीला जाण्याचा प्लॅन करुन तो निघुन गेला. पण मला विचारात टाकुन… भारतामधला एक भाग.. ज्या बद्दल ना सरकारला काही काळजी आहे ना जनतेला.. तेंव्हा ह्या उल्फा च्या लोकांचं अघोषित राज्य आहे तिथे.
ही परिस्थिती आसाम ची .. नागालँड बद्दल तर न बोललेलेच बरे! तिथली राज्य भाषा इंग्रजी. चेहेरा पट्टी मंगोलियन्स स्टाइलची , त्यामुळे ते भारतीय असूनही परदेशी वाटतात. ते लोक तूम्हाल विचारतात, आप इंडीयासे आये है क्या…?? काय बोलणार? ह्या लोकांना पण ते स्वतः भारतीय आहेत असे वाटत नाही! ना शासनाचे लक्ष ना कुठल्याही प्रकारे त्यांचे शासना मधे कॉंट्रिब्युशन .
काही कंपन्या आपले प्रॉडक्टस इथे विकायला तयार नसतात आणि विकले तरी वॉरंटी सर्विस मिळणार नाही असे स्पष्ट लिहिले असते वॉरंटी टर्म्स मधे. दोन वर्षापूर्वी क्रॉंप्टन ग्रिव्ह्ज च्या सर्व्हीस इंजिनिअरला किडनॅप करून काही लाखांची मागणी केली होती. कंपनीने पैसे दिले नाहीत म्हणून त्याला हाल हाल करून मारले . तेंव्हा पासून त्यांचं ऑफिस बंद करून टाकलं आणि तिथल्या इंजिनिअरला पण परत बोलावून घेतलं.
गौहाती हा असा भाग आहे की त्या भागापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायची म्हणजे नॉर्थ बंगालला पुर्ण वळसा घालुनच जावं लागतं-मध्ये बांगला देश असल्यामुळे. हे इतकं अंतर रस्त्याने कापणं तसं तसं अवघडच.. कारण सगळा हिमालयातला दऱ्या खोऱ्यात ला रस्ता.. पुण्याहून ट्रक निघाला तर कमीत कमी १० दिवस तरी लागणारच पोहोचायला. आणि पुन्हा प्रवासातले इतर धोके आहेतच. फक्त हेच टाळण्यासाठी तिथे त्याने जनरेटर्स असेंब्ली ची फॅक्टरी उघडली . केवळ इंजिन, अल्टरनेटर चे ट्रान्सपोर्टेशन केले आणि लोकल असेंब्ली केली तर ट्रान्सपोर्टेशन चा बराच खर्च वाचतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज आला आणि म्हणाला, चलो सर आपकॊ माताजीके दर्शन कराता हु.. म्हणुन देवी ला गेलॊ . लहान गावातला फायदा म्हणजे, इतकी मोठी रांग असूनही मनोज च्या मुळे ५ मिनिटात दर्शन घेउन आम्ही बाहेर पडलो.
डीजी सेट्स ची सिओपी म्हणजे सेंट्रल पोल्युशन बोर्डाच्या माणसांकडुन कन्फर्मेशन ऑफ प्रॉडक्शन चे इन्स्पेक्शन असते, ते होते. आमच्या डीलर ची फॅक्टरी गौहाती पासून ३० किमी अंतरावर असेल . बरं कॅंपस पण अगदी रिझर्व पोलिस फोर्स च्या स्पेशल एरिया मधे. तिथे पोहोचताना जागोजागी बॅरियर्स लागले होते. शेवटच्या बॅरियर पासुन १०० मिटर अंतरावर त्यांची शेड असेल.
मनोजचा फॅक्टरी इंचार्ज म्हणजे फुकन. हा एक लोकल माणुस. दिसायला अगदी पक्का आदिवासी ! त्यामुळे जरी चांगले कपडे घातले असले तरीही त्याच्याकडे पाहिले की संशय यायचा की हा उल्फा वाला तर नाही? बरं हे केवळ मलाच वाटलं असं नाही, दुपारी आम्ही जेंव्हा काझिरंगाला निघालो तेंव्हा प्रत्येक चेक पोस्ट वर याला खाली उतरवुन तपासणी करण्यात आली.
त्याची कामाची तयारी पाहिली आणि तेवढ्यात शेवटच्या गेट जवळ मोठा फटाका फुटल्या सारखा आवाज आला. आम्ही जाउन पाहिलं तर सिक्युरिटी वाला जखमी होऊन पडला होता. गावठी बॉंब चा स्फोट झाला होता. सगळे खिळे , छर्रे इकडे तिकडे पडलेले दिसत होते. सिआरपिएफ ची कॉलनी असल्याने ५च मिनिटात मिलिट्री पोलीस आले. नया आदमी कौन है म्हणून माझ्याकडे बोट दाखवून चौकशी सुरू झाली. पण मनोज ने सांभाळून घेतले.. माझं निसर्ग सौंदर्याने भारावलेले मन एकदम वास्तवात आलं आणि वाटलं की नकॊ हे सुंदर हिमालय, आपलं चिपचिप वातावरण असलेलं मुंबईच बरं..
केवळ दोन दिवसांचा सहवास, पण मनोज एकदम अंत रंगातला मित्र झाला होता. जेंव्हा कधी मुंबईला पाउस पडतो, किंवा २६/११ सारख्या प्रसंगी त्याचा फोन हमखास असतो. सब कुशल मंगल है ना?? असा सदा परिचित हसऱ्या आवाजात विचारतो. तसेच प्रत्येक सणाला एक एस एम एस ठरलेला.. आणि प्रत्येक वेळी फोन ठेवतांना म्हणणार… ’सरजी.. भाभीजी और बच्चॊको लेके जरुर जरुर आना.”.












