साहित्य सम्मेलनाची पिपाणी वाजणार आज..स्यान होजे- बे एरियामधे…

साहित्य संमेलनाची पिपाणी वाजणार आज..स्यान होजे- बे एरियामधे…आधी मी लिहिणार होतो की बिगुल वाजणार अखिल विश्व साहित्य संमेलनाचा. पण नंतर लगेच लक्षात आलं, अरे फारच कमी लोक गेले आहे त्या संमेलना  करता.. तेंव्हा बिगुलाची काय गरज? साधी पिपाणी पुरे होईल..;)

कौतिकराव ठाले पाटील  ( ह्या माणसाचं कर्तुत्व काय? हा एक मोठा प्रश्न आहे) जागतिक  मराठी साहित्य संमेलनच हे डीक्लीअर केल्यावर  ह्या माणसाच्या नशिबी जितके शिव्या शाप आले असतील तितके अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदाच मिळाले असतील.

शेवटी जेंव्हा फारच फरफट झाली, तेंव्हा यांनी हे अखिल  विश्व साहित्य संमेलनच आहे आणि ८२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन महाबळेश्वर ला होईल हे जाहीर केले.

मराठी विश्व साहित्य संमेलन  जाहीर केल्यावर श्री बाळासाहेबांनी ह्या कौतिक रावाला मस्त झापला होता सामनाच्या अग्रलेखामधे.. बाळासाहेब म्हणाले, आधी मराठी माणुस भाषेने आणि पैशाने श्रीमंत होऊ द्या. ग्रंथालयातील पुस्तकांना वाळव्या लागल्या आहेत. एखाद्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या १५०० आवृत्त्याही खपत नाहीत.तिकडे आधी लक्ष द्या. ते जास्त महत्वाचे आहे.

अमेरिकेतल्या साहित्य सम्मेलनात दोन नवीन साहित्यिकांचा शोध लागला आहे आणि त्याबद्दल सगळी मराठी जनता कौतिकरावांची ऋणी आहे. ह्या संमेलनाचे उदघाटक हृदयनाथ मंगेशकर  आणि आशा भोसले  हे साहित्यिक (?) करणार असल्याचे वाचनात आले. ह्या दोघांनाही विथ ड्यु रिस्पेक्ट… अनादर करायचा नाही, पण यांचं साहित्यिक योगदान काय?

शेवटी आज पहिल्या अखिल विश्व साहित्य संमेलनाचं उद्घाटन! १४ , १५ , आणि १६ तारखेला चालणाऱ्या ह्या  ३ दिवसाच्या संमेलनांना जाण्यायेण्याचा निव्वळ खर्च  ८० हजार ते १ लक्ष रुपये रहाणार आहे.

ह्या कौतिकरावाने राजारानी ट्रॅव्हल्स बरोबर पण ‘सेटींग’ केलेली दिसते. विमान चार्टर करुन जाणार की सध्या अस्तित्वात असलेल्या एअर लाइन्स ची  तिकिटे घेणार हे काही कळले नाही. पण राजा राणी ट्रॅवल्स च्या अभिजित पाटील यांनी काय तो खुलासा करावा. पुण्याला झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्स  मधे राजाराणी चे मालक ह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते असे  मटा ला छापुन आले होते..

विमानाचे तिकिट दर ठरवताना राजाराणी सोबतच कॉग्स ऍंड किंगस, सारखे इतर एजंटस ही बोलावले असते तर अजुन चांगले रेट्स मिळाले असते. पण विदाउट कॉंपिटिशन राजा राणी ट्रॅव्हलस ला सगळे प्रवास अरेंज करण्याचे अधिकार दिले गेले… कारण काय असावे बरं ह्याचे???

जर .. चार्टर विमान नसेल तर, जाण्यायेण्याचा   तिकिट दर ठरवणारे हे राजा राणी ट्रऍव्हल्स कोण? बे एरिया च्या लोकांनी येणाऱ्या पाहुण्याची रहाण्याची व्यवस्था केलेली असल्याचे  समजते, तेंव्हा राजारानी ट्रॅव्हल्स ला हे १लक्ष रुपये कशा साठी द्यायचे? या पैकी काही पैसे  इतर कामासाठी राजा राणी ट्रॅव्हल्स वापरणार का?  हा सगळा आर्थिक व्यवहार संशयास्पदच दिसतो..

जेंव्हा कौतिकरावांवर ( कसलं अगडबंब नांव आहे, ह्यांच्या माय बापाने पण नावामध्ये ’राव’ लावून टाकल्याने ह्यांची लायकी असो किंवा नसो , यांना ’राव’ संबोधावे लागते. हुशार होते हं , ह्यांचे आई वडील..)काही दिवसांपूर्वी एक सुंदर लेख वाचनात आला होता,एका सोशल साइट वर..त्या लेखामधे बे एरियाचे सर्वेसर्वा   यांच्यावर काही आरोप करण्यात आले आहेत. हा लेख अमेरिकेत आणि भारतात रहाणाऱ्या प्रत्येकानेच वाचायला हवा. इतका सुंदर आणि अभ्यास पुर्ण लेख आतल्या गोटातून काढलेल्या माहिती शिवाय कधीच लिहिला जाऊ शकत नाही, आणि त्या मुळेच त्या लेखातले   आरोप हे खरे आहेत असे वाटते.

एका लेखा मधे वाचनात आले, की कौतिक रावांनी म्हंटले आहे की हे जे मराठी पुस्तकाचे प्रकाशक आम्हाला (?)      (म्हणजे साहित्य संघाला असावं बहुतेक, आपण आपली नजर स्वच्छ ठेवावी, तिकडे काहीही असो .. आपल्याला काय त्याचं, फक्त समजुन घ्यायचं खरं काय ते!) पुस्तकाच्या विक्री मधून  एक टक्काही देत नाही.तेंव्हा त्यांना महाराष्ट्रात   संमेलनं घ्या असं म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. मग ढाले पाटलाला एक विचारावंसं वाटतं.. बे एरियाने किती टक्के दिले म्हणून तिथे सम्मेलन भरवताय??

हे सॅन होजे मधल्या सम्मेलना साठी जाण्याकरता श्री मंगेश पाडगांवकर, श्री सुभाष भेंडॆ आदी लोकांनी नकार दिला होता, पण फुकटची परदेश वारी पदरी पाडून घेण्यासाठी  मात्र  बरेच साहित्यिक, कौतिकरावांच्या ’खाली’ गेलेत असेच म्हणावे लागेल. ज्यांनी ह्या सम्मेलनाला विरोध केला, त्यांची नांव सम्मेलनाच्या लिस्ट मधून काढून टाकली असे वाचण्यात आले आहे.

ब्लॉग सुरु करुन आता फक्त  ३ आठवडे झाले आहेत. फार पुर्वी पासून हा विषय मनामधे खदखदत होता. सगळी मळमळ बाहेर पडली आता बरं वाटतंय..  तर आता ह्या विषयावरचे वादळ थांबेल किंवा संथ होईल… फक्त एवढंच बघायचं की सॅन होजे ची  पिंक कौतिकराव  महाबळेश्वर ला कसे टाकतात ते.

शेवटी..

१) हे अखिल  विश्व साहित्य संमेलनं आवश्यक आहे कां?
२)हे पैसे महाराष्ट्रातील ग्रंथालयांची स्थिती सुधारण्यासाठी जास्त चांगल्या प्रकारे वापरता आले नसते कां?
३)सरकारी मदत २५ लक्ष , फक्त प्रवासावर खर्च करणे कितपत योग्य आहे?
४)सरकारने अशा प्रकारची रुपये २५ लक्ष मदत देणे आवश्यक आहे कां? हे पैसे सरकारला एखाद्या कन्स्ट्रक्टीव्ह कामासाठी किंवा मुख्यमंत्री निधिमधुन गरिबांच्या वैद्यकिय मदतकार्य करण्यासाठी वगैरे वापरता आले नसते का?केवळ काही लोकांचे परदेश वारीचे चोचले पुरवण्या करता   हे पैसे उधळले गेले असे मला तरी वाटतं..

हा कौतिकराव म्हणजे साहित्यिक विश्वातला “बारामतिकर” आहे असं माझं प्रामाणिक मत आहे……:)

This entry was posted in साहित्य... and tagged . Bookmark the permalink.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s