माझ्या लहानपणी माझे मित्र होते शाम जोशी, सुन्या महाजन आणि दिलिप राखे. ह्यांच्या व्यतिरिक्त पण बरेच मित्र होते, पण खास मित्र म्हंटलं की शाम्या ,सुन्या,अन दिलप्या तिघांची नावं आठवतात.
शाम्या अगदी ५ वी पासुनचा मित्र. अगदी ११वी मॅट्रिक पर्यंत. आमचं लहानपण एका लहान गावात म्हणजे यवतमाळला गेलं. तेंव्हा टीव्ही तर दुर फक्त रेडिओ होता. तसा, रेकॉर्ड प्लेअर असायचा काही श्रीमंत लोकांच्या कडे. त्यामुळे शाळा सुटल्यावर घरी बसणं म्हणजे एक शिक्षा असायची. घरी पोहोचलो की मग दप्तर फेकुन खेळायला बाहेर पडायचॊ.थोडावेळ खेळणं झालं की मग शाखेत जाउन परत घरी यायचो.
शाळा दुपारची होती त्यामूळे घरी पोहोचायलाच ६ वाजायचे. शाळेसाठी बस नव्हती तर पायी चालत जावं लागायचं. शाळा साधारण पणे २ किमी होती.येतांना मी , दिलप्या अन शाम्या एखादा एखादा दगड, कींवा एखादा रिकामा डबा पायाने उडवित घरी कसे पोहोचायचो तेच कळत नव्हतं. पायी चालणं कधीही कंटाळवाणं झालं नाही.
शाम्या जोशी म्हणजे माझा खुपच जवळचा मित्र. हा अगदी लहान असतांना पासुन सुंदर मुर्ती बनवायचा. बरं याला कोणीही शिकवले नव्हते की मुर्तीकाम किंवा पेंटींग..काही मुलं, कलेची दैवी देणगी घेउन जन्माला येतात, त्यातलाच हा शाम. कुठलेही गायडन्स नसतांना इतकी सुंदर चित्रं काढणं म्हणजे एक दैवी देणगीच.. चित्र काढण्यात ह्याचा अगदी हातखंडा. सुंदर पेंटींग करायचा. हा पेंटींग करायचा आणि आम्ही तासन तास बघत बसायचो, की हा कसा पेंट करतो ते.
गणपती च्या वेळी पण शाम्याने बनवलेली मुर्ती खुपच सुंदर असायची. मग अगदी शाडू ची माती घेउन त्याला क्रॅक्स पडू नये म्हणुन त्यामधे गवत मिसळून त्याची मुर्ती बनवायचा तो.त्याने बनवलेली गणपतीची मुर्ती ( दत्तात्रेयाच्या स्वरुपात गाईला टेकुन उभा गणपती) मला अजुनही आठवते.बरं ह्या शाम्याचं आर्टीस्टीक व्ह्यु इतका चांगला असायचा की, सार्वजनिक गणपतीची आरास वगैरे सगळं काही हाच करायचा.
आता गणपतीचा विषय निघाला की मग अव्या जोशी हा आठवलाच पाहिजे. आमच्या पेक्षा थोडा मोठा म्हणजे फार तर २-३ वर्षानी असेल, अविनाश जोशी म्हणुन शामचा चुलत भाउ होता. मला वाटतं की ह्या जोशांच्या घरामधे सगळेच जण गिफ्टेड होते. अविनाश जोशी हा हुबेहुब मुलिच्या आवाजात गाणं म्हणायचा.ह्याचं माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उभी सुरु झालं की डॊळे बंद करुन ऐकावं.. आवाज हुबेहुब मुली सारखा..
त्या काळी एक ऑर्केस्ट्राचे पेव फुट्ले होते. कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असला की ऑर्केस्ट्रा हा असायचाच. नटराज ऑर्केस्ट्रा मधे हा गाणं म्हणायचा. ह्याच्या बहिणींचा पण आवाज फारच सुरेख होता. परमेश्वर खरंच कोणावर प्रसन्न होइल ते सांगता येत नाही. पुलं म्हणतात ना, ही कला म्हणजे श्रीमंताच्या मुली प्रमाणे ,कधी ड्रायव्हरचा हात धरुन पळून जाइल ते सांगता येत नाही….. अव्या जोशी ने पण तो काळ गाजवला. तुमच्या पैकी कुणी माझ्या पिरियडचे असतिल तर ’वंडरबॉय जोशी’ म्हणजे तेंव्हाचं मोस्ट हॅपनिंग कॅरेक्टर होतं.. मोस्ट वॉंटॆड, कुठेही गेला तरी लोकं त्याला ओळखायचे.. आम्हाला त्याच्या बरोबर बाहेर फिरतांना उगिच आपणही फार काहितरी तिर मारलाय अशा आविर्भावात फिरायचो.. अव्या बरोबर असला की उगिचच अभिमानाने मान ताठ व्हायची.. मुखयत्वे करुन गणपती, देवीच्या सिझन ला, जेंव्हा ऑर्केस्ट्रा ला खुप डीमांड होती तेंव्हा.
हा ऑर्केस्ट्रा पहाणं म्हणजे पण एक कार्यक्रमच असायचा. साधारणतः रात्री ९ च्या सुमारास सुरु होऊन रात्री १२ -१ पर्यंत चालायचा. ह्याच कार्य्क्रमामधे स्टेज डान्स म्हणजे एखादी मुलगी स्टेज वर डान्स करायची. तुम्हाला आता हे अगदी सिंपल वाटत असेल, पण त्या काळी , एखादी मुलगी नाचतांना पहायला मिळणं म्हणजे पर्वणी होती … मग एखादा मुजरा टाइप डान्स वगैरे असेल तर आम्ही मुलं मुद्दाम समोरच्या रांगेत उभं रहायचॊ.. गिरकी मारली की तो घेरदार ड्रेस वर उडायचा ना …. !!अहो १४-१५ वर्षाच्या मुला कडुन तुम्ही अजुन काय एक्स्पेक्ट कराल?? ( स्वतःचा वात्रटपणा इथे टाइप तर झालाय पण , कॉनशस माइंड म्हणतंय डीलिट करुन टाक हे वाक्य) पण एकदा लिहिलेले मी डीलिट करित नाही तेंव्हा हे वाक्य पोस्ट मधे राहिलंच…..
आमच्या काळी इतकं एक्स्पोझर नव्हतं त्यामुळे हा ऑर्केस्ट्रा एकदम हिट असायचा. मग त्यातल्या त्यात मेलडी मेकर्स हा नागपुरचा ग्रुप फेमस होता , रेकॉर्ड डान्स साठी..
त्या काळी आम्ही डाबडूबल्या ( म्हणजे झाडावर शिवा शिवी ) खेळायचो. आणी ह्या खेळामधे शाम्या एकदम एक्स्पर्ट होता. त्याच्यावर राज्य आलं की ताबडतोब कुणाला तरी आउट करायचा..हा खेळ समोरच्या चिंचेच्या झाडावर चालायचा, कारण चिंचेचे झाड एकदम पक्कं असते. आणी जरी कोणी स्विंग घेतला तरिही फांदी तुटत नाही..ह्याच खेळामधे एकदा माझा हात मोडला होता झाडावरुन खाली पडल्या मुळे..आणि वडीलांनी मात्र प्लॅस्टर लावल्यावर माझीच ’पुजा’ बांधली होती..
५ वीमधे असतांनाच एका गारुड्य़ाचा खेळ पहाता पहाता, ह्याने साप कसा पकडायचा हे पण शिकुन घेतलं त्याच्याकडुन..आणि इथुनच सर्प मित्र शाम जोशी चा प्रवास सुरु झाला म्हणता येइल.५वी ६ वीत म्हणजे शाम्याचं वय तेंव्हा फारतर १३-१४ वर्ष असेल… जेंव्हा तो जिवंत साप पकडायला लागला. तसा ही नविन शिकलेली कला.. साप पकडायची फक्त कोणाकडे साप निघाला तर जिवंत पकडायलाच वापरायचा आणि मग त्या सापाला न मारता कुठेतरी नाल्यामधे सोडून द्यायचा.
सापाच्या शेपटीला धरुन एक झटका दिला की मग साप मणके ढिले पडुन कसा हतबल होतो ते शाम्या प्रात्यक्षीकासहित दाखवायचा.. त्याला सापाला पकडतांना पाहुन आम्हालाच भिती वाटायची..
नंतर हा शिकायला म्हणुन जे जे स्कुल ऑफ आर्ट्स ला मुंबई ला गेला आणि काही दिवस ह्या साप प्रकरणापासुन दुर राहिला. जेजे मधुन ग्रॅज्युएशन केल्यावर मात्र परत यवतमाळला आला आणि त्याने सर्प मित्र शाम जोशी म्हणुन काम सुरु केले.
एकदा मी त्याच्या घरी गेलो होतो, त्याने मोठ्या कौतुकाने घरामधला अजगर दाखवला. म्हणे ह्याला सोडायचं आहे काही दिवसांनंतर.. ह्या सापांना खायला काय घालायचं???
त्याने उत्तर देण्यापुर्वी दिलप्या म्हणाला.. अबे हा एकदम पागल झाला आहे,ह्याच्या खिशामधे एक रबर बॅंड असते, आणि कुठेही पाल वगैरे भिंतिवर दिसली , की हा त्या रबरबॅंडमधे काहितरी अडकवुन तिला मारतो आणि घरी घेउन येतो म्हणे सापांना खायला म्हणुन,. मी शाम्याला म्हंटलं , माझी बायको तुला बघुन एकदम खुष होइल रे.. तिला पालिची खुप भिती वाटते.. ( कां? ते मला अजुनही कळलेले नाही ,पण पाल पाहिली की ती जोरात किंचाळते, सुरुवातिला मी धावत जायचॊ, पण नंतर लक्षात आल्यावर मात्र सरळ दुर्लक्ष करण सुरु केलं)आणी जर बाकी काही मिळाले नाही तर अंडी खाउ घालतॊ म्हणे..कोणाकडे पिंजऱ्यात पकडले गेलेले उंदिर पण शाम्या घेउन यायचा ..! दिलप्या म्हणे, ह्याच्या घरी एकदा ४ कोब्रा नाग होते .. अबे … हा शाम्या पागल झालाय ह्या सापांपायी.. .. !शेवटी ह्याची आई चिडली, म्हणे घरामधे लहान मुलं आहेत तेंव्हा कुठे ह्याने ते नाग सोडले बाहेर कुठेतरी नेउन.
नंतर काही सर्प मित्र संस्थांनी पण शाम्याच्या कामाची दखल घेतली. कुठे तरी काही छापुन येणं सुरु झालं होतं..लोकांमधे जागृती करणे हा उद्देश ठेउन केलेले कार्य आता चांगलेच फोफावले होते.. सर्प मित्र म्हणुन ह्याचं नांव विदर्भामधे एकदम ओळखिचे झाले. याने शेतावर एक सर्प उद्यान बनवायचं काम सुरु केलंय म्हणे…सर्प उद्यान बनवणे म्हणजे पण काही सोपी गोष्ट नाही. रोज सापांना खायला घालावं लागतं. रोज चिकन किंवा मटण परवडत नाही.
पण पेपरला फोटॊ ,बातम्या आल्या पासुन मात्र लोकांमधेही चांगलं नांव झालं आहे.सर्प मित्र शाम जोशी म्हंटलं की यवतमाळला कोणीही ओळखते..
माझे वडिल नेहेमी म्हणतात, लहानपणचा व्रात्य शाम्या अन हा शाम्या, इतका फरक पडलाय की कोणी सांगितले ह्याचे लहानपणचे उद्योग, तर कॊणि विश्वास ठेवणार नाही. म्हंटलं अहो दादा, आता शाम्या पन्नाशिला पोहोचलाय.. तेंव्हा तुमच्या स्मृतिमधला लहानपणचा तुमच्या मुलाचा मित्र शाम्या आणि हा आजचा शाम जोशी.. दोघांमधे फरक राहिलंच नं…..??













तुमच्या या श्याम जोशिंच व्यक्तिचित्र वाचता वाचता मी अगदी लहान होउन गेलो
आणी १४-१५ वर्षाच्या मुला कडुन तुम्ही अजुन काय एक्स्पेक्ट कराल?? [:)] [:)]
खरच परत एकदा लहान व्हावास वाटत आहे …
काल होळी झाली तेंव्हापासुन लहानपण आठवतंय.. सगळं काही चलचित्र प्रमाणे डोळ्यापुढुन गेलं एका क्षणात.पण इथे स्वतःशी प्रमाणिक राहुन खरं खरं लिहायचं ठरवलंय… पण ह्या पुढे इतर टॉपिकच कव्हर करायचं ठरवलंय.. स्वतः ला सोडून.. शक्यतोवर..!आता ह्या पुढे लहानपणचे प्रसंग बंद करणार.. अभिप्राया बद्दल धन्यवाद..
Pingback: घरटी लावा- पक्षी वाचवा… « काय वाटेल ते……..