चार लैना सुना रिया हूं…….असं ऐकू आलं की आम्ही सरसावून बसलोच. अगदी आता काहीतरी मस्त ऐकायला मिळणार ह्याची खात्री…
होळी असली किंवा एप्रिल फुल च्या दिवशी हास्य कवितांना अगदी उधाण येतं. टिव्ही वर पण बरेच कार्यक्रम होतात. अर्थात सुरेंद्र शर्मांच्या शिवाय हास्य कविता?? असंभव!!!!!! शर्माजींची स्पेशालिटी म्हणजे ते जेंव्हा कविता म्हणतात तेंव्हा अगदी कितिही विनोदी कविता असली तरीही स्वतः कधीच हासत नाहीत. अगदी शांत आणि मख्ख चेहेरा करुन बसतात. फक्त एक पॉज घेतात, आणि तेवढ्यात लोकांना जोक कळतो, आणि हास्याचे धबधबे सुरु होतात. ह्यांच्या कवितांचा कार्यक्रम एकदा तरी ऐकायलाच हवा.
आज सकाळी नाशिकहून पंचवटी ने मुंबईला आलो.हा प्रवास अगदी अविस्मरणीय झाला. कां आणि कसा ते उद्या लिहीन. पण प्रवासातली सोबत होती ’सुरेंद्र शर्मा’ची! (त्यांचा मी काढलेला फोटो इथे पोस्ट केलाय) मी मुळचा विदर्भातला,हिंदी ही सर्वत्र बोलली जाणारी भाषा. म्हणजे अगदी बस कंडक्टर ते पान वाला, रे रिक्षावाला सगळे हिंदीच बोलणार. त्या मुळे हिंदी वर विशेष प्रेम…. आणि म्हणून हास्य कवी अशोक चक्रधर, आणि सुरेंद्र शर्मा हे म्हणजे आवडीचे कवी.
ट्रेन मधे बसलो,आणि पहातो तर काय.. सुरेंद्र शर्मा????? आश्चर्याचा धक्काच बसला. सुरेंद्र शर्मांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि बरोबर प्रवास करण्याचा योग म्हणजे कपिला षष्ठी चा योग. तर आज त्यांच्या बरोबर नाशिकहून मुंबई पर्यंत प्रवास केला. एखाद्या व्यक्तीला खूप दिवसांपासून भेटायची इच्छा असते आणि अनपेक्षित पणे ती व्यक्ती समोर आली की मग काय बोलावं तेच सुचत नाही…… … नवीन वर्ष एकदम चांगलं जाणार तर…
सुरेंद्र शर्मांचे चार लैना म्हणुन एक कॅसेट होती. त्यांच्या ’घराळी’ चा उल्लेख संपुर्ण कॅसेटभर होता..माझा एक मामे भाऊ आहे गिरीश , आम्ही जेंव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र जमायचॊ , तेंव्हा सुरेंद्र शर्मांच्या चार लैना ऐकणं आणि खदा खदा हसणे हा एक आवडीचा कार्यक्रम असायचा.गिरीश तर त्यांच्या कवितांचा अगदी भक्त होता.बरं ह्या कविता एकदा ऐकुन समाधान होत नव्हते. पुन्हा पुन्हा त्याच त्या कविता ऐकायचॊ आम्ही… सगळे जोक्स माहिती असले तरीही पुन्हा ऐकतांना हसू यायचंच.. ह्याचं कारण शर्माजींचं प्रेझेंटेशन स्किल….
मानससरोवरके कौव्वे आणि बुध्दिमानोकी मुरखताए ही दोन त्यांची नवीन पुस्तकं..कविता लिहिता लिहिता त्यांनी गद्य लेखन पण केलंय..
२९ जुलै १९४५ सालचा जन्म.. एम ए हिंदी पर्यंत शिक्षण.. आणि जगभर केलेला प्रवास.. सुरेंद्र शर्मा सोलो नाईट्स च्या निमित्याने. जसे मराठी मधे पुलं एकट्याच्या भरवशावर सगळा कार्यक्रम खेचून न्यायचे तसेच ह्यांचे आहे.
अटपटे सवाल और चटपटे जवाब, हे सदर त्यांनी दैनिक भास्कर मधे १२ वर्ष चालवलं.बरं एवढं कमी होतं कां?? तर त्यांनी दोन राजस्थानी आणि एक हिंदी चित्रपटातही ( संतोष , पत्तोकीं वाजी) काम केलं.
जर तुम्ही सुरेंद्र शर्मांच्या कविता ऐकल्या नसतिल तर त्या इथे आहेत जरूर ऐका आणि पहा….. लिंक खाली दिलेली आहे…. मुद्दाम यु ट्युब इथे ऍड करित नाही कारण नंतर उगाच ब्लॉगचे पेज हेवी होते आणि लोड व्हायला वेळ वेळ लागतो…













Pingback: ’खो’ | काय वाटेल ते……..