’कलगी तुरा’ म्हणजे मला नेहेमी खेड्यामधे जत्रेमधे जी दोन कोंबड्यांची -(पायाला ब्लेड बांधुन होणारी) झुंज असेच वाटायचे. कधी पाहिली आहे कां कोंबड्यांची झुंज??
मी पाहिली आहे २० वर्षांपुर्वी एकदा! चंद्रपुरच्या जवळ असलेल्या घुग्गुस ओपन कास्ट माइन्स मधे गेलो होतो, तेंव्हा तिथे बाजार भरायचा आणि एक दिवस त्या बाजारा शेजारीच हा ’खेळ’ (?) सुरु होता. कोंबड्यांवर बेट्स लावणारे लोकं पण होते. पैशाचा खेळ होता सगळा. ऐटबाज कोंबडे आयाळी भोवतालचा पिसारा फुलवून एक मेकावर तुटुन पडत होते. कलकलाट सुरु होता नुसता- कोंबड्यांचा आणि झुंज पहाणाऱ्या माणसांचा पण.एखाद्या कोंबड्याने पळ काढायचा प्रयत्न केला की त्याचा मालक पुन्हा त्याला मैदाना ढकलायचा . कोंबड्यांच्या पायाल ब्लेड बांधलेले असल्यामुळे झुंज सुरु झाली की दोन्ही कोंबड्या रक्त बंबाळ झालेल्या होत्या. पेक्षकांमधे अती उत्साह होता. शेवटी एक कोंबडा गलितगात्र होऊन खाली पडला. पैशाची देवघेव झाली, आणि लोकं पांगले सगळी कडे.
पण आज सकाळी सौ. शी बोलतांना तिने सांगितले की कलगी तुरा म्हणजे कोंबड्यांची झुंज नाही- लोक साहित्यात तिचा बराच अभ्यास आहे नां.. म्हणुन तिलाच विचारतो नेहमी. कलगी तुरा हा प्रकार लावणी मधे आढळतो. ’कलगी तुरा’ म्हणजे सवाल जबाब..स्टेजवर एकाने सवाल केला की दुसऱ्याने त्याला उत्तर द्यायचे याला कलगी तुरा म्हणतात.
तसेच सौ. ने सांगितले की कलगी तुरा म्हणजे एक वेगळं वाद्य आहे. बऱ्याचशा गोष्टींच्या बद्दल आपल्याला वेगळंच कांही तरी प्रतिमा असतात, आणि आपण त्याच खऱ्या समजुन त्याच अनुषंगाने विचार करित असतो. असो..बरं आज हा शब्द कां डोक्यात आला ?? राज आणि दादु मुळे. मी स्वतः शिवसेनेचा अगदी कट्टर पुरस्कर्ता……. होतो..!! अजुनही आहेच……पण……??
शिवसेनेच्या वाघाची अवस्था हल्ली अगदी अगदी दयनीय झालेली आहे.वाघा कडे अपेक्षेने बघावं की आता हा वाघ खुप मोठी डरकाळी फोडणार तेवढ्या त्या वाघाच्या इतक्या मोठ्या ’आ वासलेल्या’ तोंडातुन म्यांउं चा आवाज यावा तसं होतंय. कुठल्याही बाबतीत वाघाने फोडलेल्या डरकाळीला आता कोणीच काही किंमतही देत नाही.
त्या डरकाळी ची किंमत फक्त एक हेड लाईन आणि दॅट टु ऑन सेकंड ऑर थर्ड पेज वर…सत्ताधारी पक्षाने तर ह्यांच्या डरकाळ्यांना भिक घालणे अजिबात बंद केले आहे, कारण त्यांना कळून चुकलं आहे की हे फक्त आरोळ्या ठोकणार.. बस्स.. आपण काहीही केलं तरी आता शिवसेना काहीच ऍक्शन घेणार नाही.
काय झालं नाही पटलं मी जे लिहिलंय ते? एवढ्यातलीच गोष्ट आहे, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे ला पुलंचं नांव देण्याचं फर्मान काढलं होतं शिवसेनेने. मग कांही उत्साही कार्यकर्त्यांनी एक बोर्ड लावून नामकरण झाल्याची बातमी पण आणली होती टिव्हिवर. मी पण एकदा प्रवास करतांना हा बोर्ड पाहिला होता, आणि यावर एक स्फुट लिहिलं होतं. पण नंतर काय झालं? सरकारने निर्णय जाहीर केला की ह्या रस्त्याचं नामकरण चव्हाणांच्या नावे करायचं आणि मोठा गाजावाजा करित एकदाचा नामकरण सोहोळा पार पाडला. लोणावळ्याच्या जवळ लावलेला तो शिवसेना पुरस्कृत बोर्ड पण हटवण्यात आला. आणि शिवसैनिक हताश पणे पहात राहिले. सगळं कसं शांत शांत….. होतं बघा…!!!
बांद्रा वरळी समुद्र सेतु ला विदा सावरकरांचं नांव द्या म्हणून आमच्या वाघाने मागणी केली, पण शेवटी काय तर सरकारने ह्या ब्रिजचं नांव पण राजिव गांधी ठेवलं.. शिवसेनेच्या मागणीला धुडकावून…..!! इतका अपमान होऊन पण शिवसेना शांतंच…वाघाच्या इच्छे विरुध्द इथलं एके काळी पानही हलत नव्हतं..आणि आता त्यांच्या स्टेटमेंटस फक्त स्टेटमेंट म्हणूनच पाहिलं जातं. जसे रामदास आठवले बोलतात, पण ते कोणी सिरियसली घेत नाही.. तसं काहीसं झालंय हल्ली..
नंतर वेळ आली मेटे- खेडकरने दादोजी कोंडदेवांचं नांव शिवाजी चे गुरु म्हणून अभ्यासक्रमातुन काढून टाका म्हणून सरकारवर दबाव आणला आणि ते नांव अभ्यासक्रमातुन वगळण्यात आलं. किती वट आहे बघा मेटे खेडकरचा!!! इथे पण कांही दिवसांपूर्वीच एक स्टेटमेंट होतं वाघाचं , की इतिहासाशी खेळ सहन केला जाणार नाही म्हणुन, .. पण काय झालं पुढे??? केला ना खेळ इतिहासाशी?? काय केलंत तुम्ही?? आणि हो, तुम्ही काहीच करु शकत नाही हे माहीत होतं सरकारला, म्हणूनच तर त्यांनी इतक्या चटकन निर्णय घेतला…
राज ठाकरे पण अशी स्टेटमेंट्स करण्यात मागे नाही.बाबासाहेबांना ऋषीतुल्या मानणारा आणि भर स्टेज वर त्यांच्या पाया पडणारा राज.. नुसतं बोलतो… पण पुढे काय? …..असो….
बरं हे एवढं कमी होतं कां, तर आमच्या उत्तर मुंबईमधे सगळे भैय्ये उमेदवार लादले आहेत आमच्यावर. आता शिवसैनिकांना हा प्रश्न आहेच नां की मत द्यायचं कोणाला? भैय्याला की मनसे च्या मराठी माणसाला?
कलगी तुरा आजकाल रोज सुरु झालाय. त्या मूळे सगळ्यांची खूप करमणूक होते, पण तुमचं दादु आणि राजचं नांव अजुन खराब होतंय. इतर पक्षातले लोकं ही आपसातली मारामारी बघून आनंदी होतात.पण शेवटी तुमच्या अशा सार्वजनिक भांडणात सामान्यांचा जीव जातो नां.. त्याचं काय?? शेवटी मराठी माणुस म्हणून एकच वाटतं की त्या कोंबडीच्या झुंजी प्रमाणे ह्या दोघांचं होऊ नये.. बस्स इतकंच……!!!!!













नमस्ते.
मराठी माणसात जाहीर भांडणे नकोशी होतात,तुम्ही सर्व शाखा मिळून निवेदन द्या हे थांबवा.पक्ष कोणताही असो,जागो असे मतदारांना वाटत निश्चीत असेल.बघण्याशिवाय काही पर्याय आहेत का ते? शोधणे अधिक आवशक आहे.राजकारण गहन विषय आहे.
आपला हा पक्ष असूनही विचार परखडपणे मांडलेत,माझे प्रांजळ अनुमोदन.
anuja
अनुजा
मला शिवसेनेने म्हणजे दादुने राजवर किंवा राजने दादुवर केलेली कॉमेंट वाचायला अजिबात आवडत नाही . मी जरी राजचा पुरस्कर्ता नसलो, तरी पण राजवर पब्लिकली अशा कॉमेंट्स झालेल्या, किंवा राजने उद्धववर केलेल्या कॉमेंट्स वाचायला अजिबात आवडत नाही. शेवटी ती एक लोण्याच्या गोळ्याची गोष्ट माहिती असेलंच..
एकदा दोन बोक्यंना लोण्याचा गोळा सापडतो.दोघंही ठरवतात की हा गोळा आपण अर्धा अर्धा वाटुन घेउ पण दोघांचही एकमत होत नाही दोन भाग करण्यात.
तिकडुन एक माकड चाललं असतं, ते मदत ऑफर करतं. एक तराजु घेउन दोन्ही बाजुला अर्धं अर्धं लोणी घालुन दोन भाग करण्यासाटी.. बाजुचं पारडं जड झालं, मग काय त्या माकडाने दुसऱ्या बाजुचा एक लहानसा लोण्याचा गोळा काढुन खाउन टाकला, बॅलन्स करण्या साठी.
आता पुन्हा पहिल्या बाजुचं पारडं खाली गेलं होतं , आणि आता माकड इकडच्या पारड्यात्लं लोणी काढून खातो.. पण बॅलन्स होत नाही. असं होता होता सगळं लोणी संपुन जातं आणि दोन्ही बोक्यांना कांहिच मिळत नाही..
अशी अवस्था होऊ नये म्हणजे मिळवले..
महेंद्रजी, अगदी खरं बोललात. यांनी आपापसात सामने रंगवण्यापेक्षा आपण कशासाठी निवडणूकीला उभे रहातोय, याकडे लक्ष दिलं तर बर होईल. पूर्वी ’बाळासाहेबांना शिवसेनेतून वजा केलं तर काय उरतं?’ अशी सोपी वजाबाकी होती. आता त्याचीही गरज उरलेली नाही. राज कडून ब-याच अपेक्षा आहेत. सत्ता त्याच्या हातात आल्यानंतर, तो जे बोलतोय, ते त्याने करून दाखवावं म्हणजे झालं.
राजकारण माझा प्रांत नाही. पण एक मराठी माणुस म्हणुन मला काय वाटलं ते इथे लिहिलंय.
दोन्ही पक्षांनी आपण काय करणार हे सांगितलं तर जास्त बरं होईल.. अगदी सहमत आहे तुमच्या मताशी.ं
हे जाहिर भांडणं थांबवले पाहिजे आणि अशा निगेटिव्ह हेडलाइन्स देण्यापेक्षा कांहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह स्टेटमेंटस दिले तर बरं होइल..
सुंदर!! प्रतिभा जबरदस्त आहे ….. खरच तुमच्या सारखे खुसखुशीत मला लिहिता आले असते तर??
अपला,
(फुसफूशीत) विशुभाऊ
विसुभाउ
प्रतिक्रियेकरता आभार..
अहो तुमचे लेख पण नेहेमिच वाचतो मी. मस्त
असतात.. मुड फ्रेश होतो वाचलं की.. :
मस्त अन्वयार्थ जोडला आहेस …
मुंबईमध्ये मराठीची गळचेपी सुरूच राहणार आहे ह्या पुढेसुद्धा. राजच्या आंदोलनामुळे फरक पडला आहे बराच असे वाटते आहे मला. शिवसेना ह्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाल्याचे पुन्हा किमान दाखवते तरी आहे (म.न.से. मुळे).
‘जेंव्हा महाराष्ट्र – मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा उचलला जातो तेंव्हा समजायचे की निवडणूका जवळ आल्या आहेत.’ उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो, तो मराठी असेल तरच त्याला मत देणार. नाहीतर नाही.
रोहन
मला पण तेच वाटतंय, की पक्षसापेक्ष मतदान करण्यापेक्षा व्यक्तीसापेक्ष मतदान करावे. एकदा निवडणुका संपल्या की पुन्हा मांडवली सुरु होईल सत्ताधारी पक्षाची कांस धरण्यासाठी..
मतदारांना हे लोकं ग्राह्य समजुन ( टेकन फॉर ग्रांटेड) वागतात, ह्याचंच दुःख होतं..
आणि शिवसेनेचा आक्रमक पणा हेच मुख्य हत्यार होतं जे त्यांनी आता मॅन करुन ठेवलंय.
आक्रमक पणा दिसतो तो केवळ राज वर कॉमेंट करतांना.. अरे काय हे.. असं करण्यापेक्षा समोरासमोर बसुन एकदा सगळं संपवुन कां टाकत नाहित हे दोघंही जण..???
सर्वजण नुसते ‘मुंबई मराठी माणसाची’ करत बोंबा मारत आहेत. महाराष्ट्राचा विचार कोण करणार आहे देव जाणे ??? तिकडे आमचे शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत. मासेमार कोळी परदेशी कंपन्यांच्या ट्रोलर समोर हताश बसलाय. उद्योग महाराष्ट्र बाहेर जातोय आणि कामगार हताश बसले आहेत. अरे काय चाललय काय ?? आपण ही असे हातावर हात धरून असेच आत्मकेन्द्री जीवन जगणार आहोत का ??? की आपण काही करू शकणार आहोत ?
एक नेता असा आहे का की ज्याच्याकडे आपण ह्या विश्वासाने बघू शकतो??? शिवसेनेने मुंबई महापालिकाच्या पुढे काही मजल मारलेली नाही. एकदा मिळालेली सत्ता टिकवता नाही आली त्यांना. मनसेला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मला खात्री आहे शिवसेना आणि मनसेमुळे पुन्हा कोंग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.
आपल्या मतांशी सहमत आहे….
बरं तरी त्या कोंबड्यांना (जत्रेतली नाही बरं, ती पॉलिटिक्सवाली…!) कापून खात नाहीत कोणी…..! नाहीतर नुसती कॉक- कॉक करत बसले असते ते…..! हा… हा….
काका, खरयं ना….!
>>> राजकारण करताना या मंडळींनी एकमेकांवर टिका करण्यापेक्षा ज्याने जनता ग्रासतेय ते मुद्दे ऊचलून धरावेत… हं मला राज ठाकरे यांचे विचार पटतात, पण जेव्हा ते उद्धववर किंवा अन्य नेते (लालू-बिलू सोडून हं…!) यांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी टिका करतात, तेव्हा मात्र खटकते…. प्रत्येक नेत्याबाबत माझी हीच प्रतिक्रिया आहे… धन्यवाद…
विशाल
प्रतिक्रियेकरता आभार.
what u hav written is absolutely right.both of them should stop this behaviour.
others are getting entertained, media getting high trp for their quarral.
लक्ष्मी
प्रतिक्रियेकरता आभार.. त्याचं काय झालं, मलडला आमच्या घरासमोर एक फ्लाय ओव्हरचं काम सुरु आहे- गेली चार वर्षं. जवळपास पुर्ण होत आला होता, आणि दोन दिवसानंतर त्याचं उदघाटन होतं . एक तारखेच्या रात्री कांही शिवसैनिक आले आणि फ्लायओव्हरचे सगळे अडथळे दुर करुन फ्लाय ओव्हर सुरु केला. फार तर एक तास सुरु राहिला , आणि नंतर पोलिसांनी बंद केला.
त्या नंतर दोन दिवस एकही शिवसैनिक तिकडे फिरकला नाही, परत सुरु करायला. ह्यांचं सगळं टिव्ही वर येण्यासाठिच असतं. नंतर ऑफिसिअल उदघाटन आज होई पर्यंत फ्लाय ओव्हर बंदच होता. मग या लोकांनी काय अचिव्ह केलं ?? कांहिच नाही.. !!!
काका, आता २ वर्षे झाली मुंबईत येऊन. गावाकडे होतो तेव्हा कधी असले प्रश्न नव्हते पडले (मराठी X अमराठी). तिकडे पण निवडणुक काळात आपलीच माणसे भा्डत पण प्रश्न वेगळे. पण ईकडे आल्यावर कळल ईकडची भांडणे वेगळी तिकडची वेगळी. ईकडे खरच काका पुतण्यानी भाडायला नाय पाहिजे.
बेसिक प्रॉब्लेम एकच आहे. मराठी माणसाचे अस्तित्व.. सध्या तरी मुंबईतलंच..
अगदी खर बोललात. खरच वीट आलाय या कलगी तुर्याचा. कमीत कमी दोघांपैकी एकाने तरी शहाणपण दाखवाव. राहता राहिला प्रश्न मत कोणाला द्यायचा. तर मनसे वाला फक्त मराठी आहे म्हणून त्याला मत देऊ नये. त्या उत्तर भारतीयाने गेल्या काही वर्षात खरच काही चांगल काम केलाय का ते पहावे. माहीत नसेल आर टी आय ने जमल्यास माहीत करून घ्यावे. लक्षणीय काही काम केले नसल्यास सरळ मनसे ला मत द्यावे. कारण अजुन त्यांना संधी मिळाली नाहीय. पण जर का त्या यू पी वाल्याने खरच चांगल काम केल असेल तर त्याला मत देण्यात काहीच वावगे आहे असे मला तरी वाटत नाही.
रोहन, प्रविण
तसं पहायला गेलं तर शिवसेनेची मजल मुंबई, पुणं आणि नंशिक कोंकण पलिकडे कधीच जाउ शकली नाही. राज मनसे पण फक्त मुंबई पुरतीच मर्यादित आहे. इतर भागासाठी त्यांच्याकडे काहिच अजेंडा नाही. तसं पहायला गेलं तर इतरही जे मराठी नेते निवडुन आले आहेत त्यांनी पण काय दिवे लावले आहेत हे आपण पहातोच.
नुसता सावळा गोंधळ आहे हा.. राष्ट्रिय पातळिवरचे मराठी नेते पण मराठी साठी काहिच करत नाहित. असो.. आलिया भोगासी असावे सादर, चित्ती असु द्यावे समाधान…
राजकारण म्हणजे डूकराशी घाणीत कूस्ती खेळण्या सारखे आहे….
थोड्याच वेळात कळते की, आप ण घाण होत आहोत…
पण
डुकराला मज्जा येत आहे…………………………………………….
राजीव
आणि आपण घाण होत आहोत..
१०० टक्के मान्य.. डुकराला मजा येते आहे..
नीगेटीव्ह मतदान सुरू केले पाहीजे…
४५ % पे़क्शा कमी मतदान झाले तर त्या मतदार संघात
कमीशनर शासन लागू करावे…..
ह्या आपल्या(च) लोकांच्या भांडणामुळे मराठी माणुस अगतिक झाल्या सारखा वाटतो आहे. राज व उध्दव ला हे कोण समजावुन सांगणार?
मनोहरपंतांनी थोडा प्रयत्न केला होता पण बाळासहेबांच्या तंबी मुळे तेही गप्प बसले. शेवटी दुर्दैव मराठी मणसांचे !!
रवि करंदीकर
Mahendraji, nehamipramane sadetod ani utsfoort..