मुंबईकर तीन गोष्टींच्या बाबतीत फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे अर्थातच क्रिकेट!- आता त्यात नवीन काय? ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता?? खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर चर्चा करण्याचा खेळ आहे
पण क्रिकेट व्यतिरिक्त अजून दोन गोष्टी आहेत की ज्यावर चर्चासत्र सगळीकडेच झडतांना दिसतील तुम्हाला – अगदी लोकल पासून तर ऑफिस लंच टाइम मधे सगळीकडे!! या विषयावर बोलतांना कधीच थकत नाहीत मुंबईकर.
मुंबईकर मंडळी मुळातच चर्चाळू !! आता चर्चाळू म्हणजे कशावरही चर्चा करायला आवडणारा. भर उन्हाळ्यात पण लोकल मधे कसल्या तरी मुद्यावर( मग तो आयपीएल असो की आज सकाळी बायकोने नाश्ता करायला शिळी चपाती आणि आम्लेट दिलं यावर अ्सो ) चर्चा करतांना मुंबईकर इतका रंगून जातो (आणि तो इतका सेन्सिटीव्ह आहे) की त्याला स्थळ, काळ कसलंच भान रहात नाही. या वर्षी तर आयपीएल बरोबर शशीथरुर , ललित मोदी बरोबर सुनंदा पण होती तोंडी लावायला- मग काय मुंबईकरांची मज्जाच मज्जा!! लोकल मधे माझे तर महिनाभर अक्षरशः कान किटले सारखं तेच ते आयपीएल बद्दल ऐकून.
एकीकडे उन्हामूळे अंगाची होणारी काहली, हवेचा कणही जायला जागा शिल्लक नसलेल्या गर्दी मुळे लोकल मधे कसा तरी उभा राहून , आणि घामाने भिजलेल्या शर्टकडे ( फक्त शर्टच नाही तर अगदी अंतर्वस्त्रापर्यंत सगळं भिजलेले असते) संपुर्ण दुर्लक्ष करून , झालेल्या घामोंळय़ाची काळजी न करता,एकमेकांशी चर्चा करतांना – बरेचदा तर अहमहमिकेने भांडताना मुंबईकराला लोकल मधे पाहिलं की धन्य धन्य वाटतं. आणि सहन त्याच्या सहनशक्तीचा आदर वाटतो. असो मुद्द तो नाही.
उन्हाळ्यामधे, मंगळवारी सिद्धिविनायकाला गेल्यावर फुलांची माळ घालायला एक वेळ मुंबईकर विसरला- असं ऐकलं तरीही मी विश्वास ठेवेन पण मुंबईकर मराठी माणसाने उन्हाळ्यात कांद्याची माळ आणली नाही हे जर कोणी सांगितलं तर मी अजिबात विश्वास ठेवणार नाही. या कांद्याच्या माळेचं आणि मराठी मुंबईकराचं फारच जवळचं सख्य आहे .
सुरुवातीला म्हणजे मार्केटला जेंव्हा येते तेंव्हा या माळेचा १४० ते १५० पर्यंत भाव असला, तरीही खरा मुंबईकर माळ विकत घेणार म्हणजे घेणारच! माळेच्या कांद्याची चव फक्त मुंबईकरच जाणतो, त्यामूळे पांढरा माळेचा कांदा, हा विकत घेतलाच जातो.
एखाद्याच्या टीफिनमधे लंच टाइम मधे माळेचा कांदा दिसला की ताबडतोब त्यावर डीस्कशन सुरु होतं . आला का मार्केटला?? कितीला आहे माळ एखादा आसुसलेला माणूस विचारतो. कांद्याच्या माळेच्या भावाची चीरफाड सगळे जण सुरु करतात – कित्ती महाग झालाय हल्ली.. ज्याने अजून माळ आणलेली नाही, तो मनातल्या मनात ठरवतो, की हो आता आजच घरी जातांना मंडपातून न्यायची घरी माळ म्हणून. थोडं विषयांतर .. हे अकलेचे कांदे म्हणतात ते कॊणाला? हा मला पडलेला प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.दुसऱ्या दिवशी पासून सगळ्यांच्याच डब्यात माळेचा कांदा दिसायला लागतो.
घरी पण येता जाता स्वयंपाक घरात “कांद्याची माळ” खुंटीवर विराजमान झाली की बगळ्यांची माळ फुले च्या चालीवर कांद्यांची माळ फुले अजुनी खुंटीवर हे गाणं सारखं आठवत असतं.
उन्हाळ्याची चाहूल आंब्याची चाहूल असते.उन्हाळा येतो तो घाम ,वैताग, गरमी हे सगळं घेउन. उन्हाळा एकच आनंदाची गोष्ट घेउन येतो ती म्हणजे ’हापुस’ !!! येणार- येणार म्हणुन आधीपासूनच गाजावाजा झालेला हापुस म्हणजे तर मुंबईकरांचा -विक पॉइंट! मुंबईकरांचा काय, हापुस तर अख्ख्या जगाचा विक पॉइंट आहे .
मटा मधे बातमी येते की हापुसची पहिली पेटी चार हजारात विकली गेली म्हणून. अर्थात ही पेटी नक्कीच कुठल्या तरी गुजराथी/पंजाब्याने घेतलेली असते. त्या ऑक्शनला मराठी माणुस गेला असेल का? हा प्रश्न मला नेहेमीच छळत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकल मधे कोणीतरी पेपर उघडतो, अन त्यावर चर्चा सुरु होते. आंबे कसे महाग झाले आहेत, चांगला माल कसा दुबईला एक्सपोर्ट होतो आणि सेकंड क्वॉलीटी भारतात विकला जातो ,वगैरे.
को्णीतरी नुकतंच कोंकणात जाऊन आलेलं असतं, तो सांगत असतो, की यावर्षी आंबा चांगला येणार नाही कारण परवाच्या वादळात सगळा मोहोर गळून पडला – वगैरे.त्याने एवढं सांगितलं की सगळ्या ऐकणाऱ्यांच्या चेहेऱ्यावरचे काळजी युक्त भाव अगदी दगडी मनाला पण पाझर फोडणारे असतात.
च्यायला- साला आंबा नाही या वर्षी म्हणजे काय़? मागल्या वर्षी आम्ही चक्क ४८० रुपयांच्या भावाने खाल्ला हो आंबा. आता या वर्षी किती होणार भाव कोण जाणे. नाहीतर आपल्याला राजापुरीवरच समाधान मानावं लागेल असं दिसतंय. तेवढ्यात दुसरा कोणीतरी मधेच बोलतो, आम्ही तर गोखल्यांच्या कडूनच आंबे घेतो बॉ! खात्रीशीर माल असतो त्यांचा -देवगडचा. थोडा महाग असला तरीही क्वॉलिटी गॅरंटेड असते.
मधेच कोणीतरी आम्ही मागल्या वर्षी गांवी गेलो होतो आणि तिथुन आणलेला हापुस कसा मस्त होता ते रंगवून सांगत असतो, तेवढ्यात कोणीतरी एखादा त्याचा त्याची टांग खेचतोच.. अरे तू महाडचा ना? मग महाडला कसले रे ते हापुस? कायच्या काय बोलतंय बग येडं…. अन सगळे लोकं अगदी पोट धरधरून हसतात.
तेवढ्यात दुसरा कोणीतरी आमच्या ऑफिसातल्या दात्याची बाग आहे म्हणे रत्नांग्रील , तिकडून मागवतो तो दरवर्षी आंबे (खरं तर कोंकणात दातेंची बाग आहे – हे सगळं ऐकीव असतं, कोणीही ती बाग पाहिलेली नसते- पण हापिसातल्या कोणालाही विचारा, दात्यांची बाग कोंकणात हे छाती ठोकपणे सांगेल कोणीही )
याच कमावलेल्या नावाच्या मिळकतीवर दातेबुवा आपला वार्षीक उद्योग ( धंदा) चालवत असतात.
सगळेच (ओरिजनल कोंकणात मूळ गांव असणारे ) मुंबईकर, “आमच्या गांवी- दहा पोफळी, अन दहा आंबा आहेत बरं का!” असं नेहेमीच सांगत असतात. मुंबईला रहाणाऱ्या सगळ्या कोंकणातल्या ओरिजिनल चाकरमान्यांच्या आंब्यांच्या झाडांची टोटल केली तर ती नक्कीच कोंकणातल्या खरोखरीच अस्तित्वात असलेल्या झाडांच्या संख्येच्या दहा पट ( की शंभर पट??) तरी होईलच यात काहीच शंका नाही.
हापुस मुंबईला आला, की ह्यावर सगळ्यात जास्त चर्चा होत असतात. मग नाक्यावरचा भैय्या कसा पायरीला हापूस म्हणुन विकतो, पासून ते कार्बाईड वापरुन पिकवलेल्या आंब्यापेक्षा खरा नॅचरल पिकलेला आंबा कसा चांगला? ह्या विषया पासून तर कोणी कोंकणात जाणार आहे कारे?? माझी पण एक पेटी आण…. इथ पर्यंत पोहोचते.
जगामधे मोस्ट फोटॊग्राफ्ड मॉन्युमेंट म्हणून ताजमहालाचं नांव आहे, तसंच जर मोस्ट डिस्कस्ड फ्रुट – म्हणुन फळाचं नांव शोधलत तर ते अर्थातच आंब्याचं नांव असेल यात दुमत नाही.















Pingback: Tweets that mention लोकल मधल्या गप्पा… | काय वाटेल ते…….. -- Topsy.com
100% true..by the way, Aamchehi 10 amba ahet ho kokanaat..kharech..
nukatach jaoon alo..
Kharech yanda hapoos la fal nahi..Chaar fanas gheun alo..gharche lok vaitagale mothe mothe fanas pahoon..
Lekh matr fakkad ho tumcha…
नचिकेत
हे जे लिहिलंय नां, ते असंच घडलं होतं .. काल जाणवलं, की लोकं फारच सेन्सिटीव्ह आहेत आंब्याच्या बाबतीत. मालाड ते दादर सारखं डिस्कशन सुरु होतं आंब्याबद्दल!
फणस कोणी गिफ्ट जरी दिला नां, तरी वैताग असतो,कारण चिरायला खूप त्रास होतो. आणि तुम्ही तर स्वतः जाणुन बुजुन घरी आणले चार फणस..घरचे लोक वैतागणारच!!
सूर्य फुलाच्या गडद टेम्प्लेट मुळे लेख वाचता येत नाही.
thanthanpal.blogspot.com
धन्यवाद.बद्लला बॅक ड्रॉप…
भन्नाट! माळेचा कांदा आणि हापूस दोन्ही माझेपण वीकपोइन्ट! बाकी लोकल मधल्या गप्पा ऐकणे म्हणजे समाजाची नाडीपरीक्षा करण्यासारखेच आहे. केवढ्या प्रकारचे विषय. पण त्यासाठी सेकंड क्लासचा प्रवास हवा. फर्स्ट क्लास मधल्या गप्पा म्हणजे तेजी मंदी आणि रिलायंस ह्या भोवती. ह्यांना हापूसच्या आंब्याच्या भावाची चिंता नाही. निफ्टीच्या भावाची जास्त चिंता. फार पूर्वी मुंबईत राहत असताना, भरपूर लोकलचा प्रवास झाला. आता १५-१६ वर्षानंतर मागच्या महिन्यात पहिल्यांदा दादर – पार्ले संध्याकाळी सात वाजता सेकंड क्लास मध्ये प्रवास केला. ते सुद्धा दारात उभे राहून. जुने दिवस आठवले आणि घाम / उकाडा वगैरेची जाणीवच राहिली नाही. अरेच्या, वाहवत गेलो. विषयांतराबद्दल क्षमस्व!
अगदी बरोबर. पण एक गृप आहे मराठी मंडळींचा फर्स्ट क्लासमधे पण. तो कायम खादाडीवरच बोलत असतो. गुजराथी माणुस मार्केट अन तेजी मंदी.
पुर्वी ९९ टक्के गुज्जू असायचे , हल्ली २५-३०टक्के मराठी असतात फर्स्ट क्लास मधे पण.
भन्नाट पोस्ट!
धन्यवाद आनंद..
माळेचा कांदा हवाच हवा…. अगदी अगदी…. इथेही मिळतो…… भाव सांगतच नाही…… पाहून मलाच चक्कर येतेयं…. त्यातलाच एक खुडून नाकाशी लावायला लागतोयं……..
लोकलमध्ये चर्चा होत नाही असा एकही विषय नसेल. अगदी घरापासून पार जगापर्यंत…. ’काय वाटेल ते….” आणि तीही मनापासून. हाडीमासी भिनलेली लोकल आणि तिच्या गप्पा हे नितांत गरजेचे समीकरण. जळवा राजे तुम्ही आम्हाला…… आता अगदी रस ओरपतांना फोटू टाकू नकोस रे….. नाहीतर तिथे आल्यावर तुला महागात पडेल हं का….. इथे मेला तो बिनवासाचा मेक्सिकन आंबा तर हातातही घेववत नाही.
आमची – हे दात्यांसारखे नाही बरं का….. आंबा-काजूची कलमे-फणस-रातांबे-करवंद जोरात आहेत पण ….. सात हजार मैलावरून कसे खावे……
(
अरे वा. घरचा पत्ता सांग तुझ्या वाटणीचं मी खाउन घेतो . हवं तर फोटॊ पाठवतो मेल ने
पण परवा जे लिहिलंय नां, अगदी तस्संच डिस्कशन सुरु होतं लोकल मधे. दादर ते कुर्ला जातांना फर्स्टक्लास हा डीव्हायडेड आहे. स्त्रियांच्या डब्यातल्या गप्पा पण स्पष्ट ऐकू येतात. सासु बाईंनी काय केलं? कशी नणंद सारखी पैसे मागवते, वगैरे वगैरे. मस्त टाइमपास होतो.
gappa aawadlya…
mast post..!
योग,
्ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार.
काय हे.. इथे हापूसचे नुसते फोटो बघायला लागतायत आणि तुम्ही त्यावरच पोस्त लिहिताय.
मस्तच झालीये !!
>> असलेल्या झाडांच्या संख्येच्या दहा पट ( की शंभर पट??) तरी होईलच
हा हा .. सहमत
हेरंब
नुसती धमाल असते.
जे लिहिलंय अगदी तस्संच डिस्कशन सुरु होतं लोकल मधे. गेले दहा दिवस रोज हा गृप आंब्यावर बोलत असतो. न कंटाळता. आणि उरलेला वेळ शशी थरुर अन मोदी. एक दिवस हरभजनने त्या अंबानीच्या बायकोला कडेवर घेतलं नां, ते पुरलं डिस्कस करायला.
आमच्याकडे पांढरा कांदा गावाहून येतो. इकडून कधी विकत घेतलेला नाही आम्ही.. आणि ‘आंबा’ बद्दल काय बोलावे..
आंबा हमको जान से प्यारा है… १९९८ च्या आसपास ७०-८० रुपये डझनने खाल्लेला आहे हापूस.. आता बघा..७००-८०० रुपये…
काय योगायोग बघा, पहाटे शिफ्ट वरुन आलो..हॉल मध्ये दोन कांद्याच्या माळा आणि इथे लॉगिन केला तर ह्याच रेफरन्स ने तुमची पोस्ट…
बोरीवलीवरुन सकाळी ८:२६ च्या लोकल मध्ये पण असा एक ग्रूप आहे की ज्याचा मी सदस्य होऊन बसलो होतो एका आठवड्यात..खूप मस्त वाटत
लोकल मधे तर लोकांच्या गप्पा ऐकणं हा माझा पास टाइम उद्योग असतो
मस्त झालीये पोस्ट…. खरयं आंबा म्हणजे दुखती नस…. ईथे मिळतो हापुस आंबा
…परवा मी मॉलमधल्या आंब्यांना उचलून उचलून वास घेऊन पहात होते तर एक स्कर्टवाली गोरी, आणि एक काळ्या डगल्यातली गोरी माझ्याकडे आश्चर्याने पहात होत्या आणि त्यामुळे अमित रागाने
पहात होता …. पण मी मात्र निवांत आंब्यांचा वास घेत होते, हापुस कसा आधि घमघमला पाहिजे, की दुरुन समजतो आला आला हापुस आला.
कांद्याची माळ नाशकात नाही पण रोह्याला खूप पाहिली.
बाकि लोकलमधल्या गप्पांचा खूप अनुभव नाहीये पण जे काही थोडफार माहितीये त्या आधारावर पोस्ट मस्त आवडली एकदम. आणि बायकांचे काय महेंद्रजी, अमित म्हणतो चंद्रावर नेल्या तरी म्हणतील, ’ अगं माझी सासू यायचं म्हणाली लगेच बरोबर, पण मी पक्की
’ …..
असो, भलतीच लांबलीये कमेंट, कालच हापुस आणलाय (मुलांच्या भाषेत ’अल्फांसो’ ) आमरस करायला जाते.
आंब्याची ओळख म्हणजेच वास असते. वासावरूनच तर हापुस ओळखता येतो. आंबा घेतांना जर सुगंध नसला, तर तो हापुस नाही असे एका जाणकार कोंकणी मित्राने सांगितलेले पक्के लक्षात असल्याने वास घेतल्याशिवाय आंबा कधीच विकत घेत नाही.
कांद्याची माळ आम्ही गावाकडे पाहिली आहे,हापूस आंबे आम्ही दुरूनच बघतो आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद
–
महेश
. धन्यवाद..
AHO… AMBA… tumhala tri lavkar bhetato..
Amha varhadyanche haal konihi vicharat naahi…
kandyachi maal..? Te Kaay asate ho?
Pan AMBA ZINDABAD..
विश्वास
सिझनच्या शेवटी स्वस्त पण असतात बरेच.
हल्ली तर सगळीकडेच सगळं काही मिळतं.. कांद्याची माळ म्हणजे पांढरा कांदा एकत्र गुंफलेला असतो वर फोटो मधे दाखवल्या प्रमाणे. हे कांदे कच्चे खायला फार चवदार लागतात. मला वाटतं की हे अलिबाग साईडला पिकतात.
आणि आंबे तर कुठेही मिळतात हो..
आंब्याच्या धंद्यात चांगला पैसा मिळतो हे ठाऊक होते पण आंब्याचे बाजारातले खरे रेट कोकण सोडल्यावर कळले. इथे बंगलोरला कुठला तरी आंबा रत्नागिरी हापूस म्हणून विकतात ;-( हे म्हणजे बीनपाण्याचा सुका नारळ “श्रीफळ” म्हणून विकल्यासारखे वाटते.
आधी आंबा, काजू, करवंद असा कोकणचा मेवा कधी विकत घेऊन खाल्याचे आठवत नाही. आंब्याचे हेच रेट माझ्या लहानपणी असते तर मी तेवढे आंबे विकून केवढा श्रीमंत झालो असतो नाय? असा विचार करून सुस्कारा सोडतो हल्ली.
अरे ही कॉमेंट उत्तर द्यायची राहूनच गेली.
हे वाक्य पर्फेक्ट!!
सुका नारळ. आमच्या कडे विदर्भात नारळ मागितला की सुका की ओला ते विचारतात. मी रत्नागिरीहून येतांना आंबे आणतो, तर एक पेटी ६०० ला पडते- ५ डझनची. तिचिच इथे किम्मत असते १५००च्या आसपास.
कोंकणातून बाहेर पडल्यावरच आंब्याची किम्मत समजते..