मराठी
जून 15, 2010 91 प्रतिक्रिया
कधी तरी आश्चर्याचा धक्काच बसतो बघा. परवाचीच गोष्ट आहे मी मुंबईच्या विमानतळावर सिक्युरीटी क्लिअर करुन पुढे उभा होतो. अजुन बोर्डींग सुरु झालेलं नव्हतं. समोर फुकट वर्तमान पत्राच्या स्टॉल कडे पाय वळले, आणि तिकडे पहातो तर समोरच एक विमानाच्या आगमनाच्या वेळांची माहिती देणारा बोर्ड चक्क मराठी मधे लावलेला दिसला. ( नेमका फोटो क्लिक केला तेंव्हा इंग्लिश झाला होता
) मला क्षणभर तर राज ठाकरे किंवा उध्दव ठाकरेच सत्तेवर आलेत की काय असे वाटले.
खूप आनंद झाला होता.कधी नाही ते महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी मधला बोर्ड पाहून खूप बरं वाटलं. आजचा दिवस तर माझ्यासाठी सुखद आश्चर्याचे धक्के देणारा होता. पेपरच्या स्टॉल वर फक्त एक गठ्ठा इंग्रजी वर्तमान पत्राचा होता, आणि इतर सगळे मराठी वृत्तपत्रे होती. सकाळ, लोकमत, पुढारी वगैरे पेपर व्यवस्थित रित्या रचुन ठेवलेले दिसत होते त्या वर्तमानपत्रांच्या स्टॅंड वर. मी समोर होऊन प्रत्येकी एक मराठी पेपर उचलला. आणि बाजूला खुर्ची शोधुन वाचत बसलो. खुर्ची अगदी त्या पेपरच्या स्टॉल च्या जवळच होती.
तेवढ्यात मराठी मधे गप्पा मारत दोन तरुण तिथे आले – बहुतेक आयटी च्या फिल्ड मधले असावे. त्यांच्या हातातल्या लॅपटॉप बॅग वर एकच लोगो होतो, म्हणजे बहुतेक एकाच कंपनीत काम करणारे होते दोघंही.
तिथे मराठी पेपर बघुन नाक मुरडून शिव्या घालत सुटले. “च्यायला, आता इथे एअरपोर्टवर पण मराठी पेपर आणून ठेवलेत, एकॉनॉमिक्स टाइम्स वगैरे ठेवायला काय होतं यांना? पार पावट्यांचं बसस्टॅंड करुन टाकलंय एअरपोर्ट म्हणजे” . ( एकोनॉमिक्स टाइम्स खाली कोपऱ्यात होता बरं कां )दुसरा म्हणतो, “अरे आजकाल लो फेअर तिकिटं असल्यामुळे पावटेच जास्त असतात एअरपोर्टला , म्हणुन पावट्यांचा पेपर ठेवलाय इथे”. बहुतेक दोघांचीही वयं साधारण २५-३० च्या दरम्यान असावी.
भरभरून संताप आला, तिरिमिरीतच उठलो, आणि त्याला म्हंट्लं की कारे बाबा, मराठीच ना तू? मग कसलं रे हे तुला डाउनमार्केट वाटतंय इथे मराठी पेपर असणं? आणि मराठी म्हणजे पावटे, म्हणजे स्वतःच्या घरच्या लोकांना पण पावटेच म्हणतोस की काय तू? मातृभाषे ला कधी नव्हे ते मिळणारं महत्व बघवत नाही का तुम्हाला? जर तुम्हीच आपल्या मातृभाषेला डाउन मार्केट म्हणाल तर इतर लोकं ’तुम्हाला’ म्हणजे मराठी लोकांना पण घाटी, डाउन मार्केट म्हणतील याची तुम्हाला जाणिव आहे का?
आपल्या मातृभाषेचा मान आपणच राखायला हवा. त्याने सॉरी , म्हणून समोरचा एक मराठी पेपर उचलला, आणि म्हणाला, माझा उद्देश तो नव्हता! आणि ओशाळवाणं हसून जाउ लागला. म्हंटलं, अरे गुजराथ मधे नेहेमी गुजराथी पेपर्सच असतात बहुतेक एअरपोर्ट्वर, राजकोटला तर फक्त गुज्जुपेपर असतो , इंग्रजी पेपर तर मागुनही मिळत नाही. इथे मुंबईला युपी बिहारची मंडळी आवर्जुन मैथिली भाषेतला पेपर वाचतात.
जर इतरांना आपल्या मातृभाषेची लाज वाटत नाही, तर तुम्हाला का म्हणून वाटते?? थोडं अंतर्मुख झालो एकदम.
बडोद्याला एअरपोर्ट वर उतरल्यावर सहज समोर लक्ष गेलं, तर एअरपोर्ट अरायव्हल लाउंज च्या बिल्डींग वर गुजराथी मधे बडोदरा लिहिलेलं दिसलं. मनात आलं, मुंबईला किंवा महाराष्ट्रा मधे मराठी कधी लिहिलेले दिसेल असे आपल्याला??
















जरा का मोठं झालं (पैश्याने) तर मातृभाषेला विसरण्याचे/लाज वाटण्याचे प्रसंग मी गोष्टी/चित्रपटांपुरते ऐकले होतं.. पण प्रत्यक्षात पण असं होतं हे वाचून जाम धक्काच बसला…
विशाल
मुंबईला लोकलच्या फर्स्ट क्लासमधे दोन गुज्जू आपली भाषा बोलतात, पण दोन मराठी माणसं इंग्रजी बोलतात. गुज्जुच्या हातात गुजराथ समाचार तर मराठी माणसाच्या हातात टाइम्स दिसतो बघ.
मस्त सुनावलेस…असे कर्मदरिद्री करंटे असतातच… अरे हल्ली आंतरराष्ट्रीय ऐरपोर्टला सुद्धा पहिली मराठीमध्ये घोषणा होते… मग हिंदी आणि मग इंग्लिश… सुधारणा आहे…
रोहन
खरं सांगतो. ते दोघं जे पावटे म्हणाले , ते मला स्वतःला उद्देशुन म्हंटल्यासारखं वाटलं होतं. म्हणुन थोडा जास्त रागावलो होतो.असं वाटलं की मराठीपेपर उचलला होता नां म्हणून.
हया असल्या लोकांमुळेच मराठीची दुर्दशा होत आहे.मराठी असुन आणि महाराष्ट्रात राहुन सुदधा कोणाबरोबरही संभाषणाला सुरुवात करतांना नेहमी हिंदी बोलणारे ही तेवढेच दोषी…मी सुदधा मराठीत बोलायला लाजणारी आणि उगीचच त्यात इंग्लीश शब्द घुसळणारी लोक पाहिली आहेत..हयात कसला मोठेपणा वाटतो हयांना कोणास ठाउक..
खरं आहे देवेंद्र. हा अनुभव तर मुंबईला बरेचदा येतो. आपण थोडं जागरुक रहायला हवं !
या असल्या वृत्तीनेच मराठीचं परप्रांतियांपेक्षा जास्त नुकसान केलं आहे. केवळ भाषा किंवा वृत्तपत्रेच नव्हे, अगदी मराठी रितीभाती, सणं यांचीही थट्टा करणारे लोक पाहिलेत मी. तुम्ही त्यांना झापलं हे मात्र एकदम ब्येस केलं.
देविदास
खूप दिवसानंतर एक आनंदाचा क्षण् होता, तो त्या दोघांनी खराब केला. मुंबई एअरपोर्ट वर मराठी पेपर दिसणं म्हणजे एक खूप आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. असो. प्रतिक्रियेकरता आभार.
आधुनिक कपडे घातलेले असले आणि मराठीत बोललं की एकदम परग्रहावरच्या माणसाकडे बघावं तसं बघतात काही जण. स्वत: मराठी असूनही मराठी बोलायची ज्यांना लाज वाटते अशा लोकांशी तर मी शक्यतो बोलणं टाळतेच आणि बोलायचं झालं तर फक्त मराठी. आधी इंग्रजी, मग हिंदी असा प्रवास करत ते मराठीकडे वळतातच. ज्यांना मातृभाषेचं महत्त्व समजत नसेल, त्यांच्याशी असं वागावं लागतं. विमानतळावर जे सर्वत्र मराठीचं चित्र तुम्हाला दिसलं, तसंच चित्र महाराष्ट्रात सगळीकडे दिसावं अशी इच्छा!
कांचन
तसा अनुभव तर बरेचदा येतो. पण शक्य तेंव्हा मी मराठी माणूस समोर आला तर मराठीतच बोलतो. मराठी लोकांच्या मधे जागृती येणं अपेक्षित आहे. तरंच काही तरी होईल. प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान वाटायलाच हवा.
ह्या लोकांबरोबर , अध्यात्मा वर आंग्ल भाषेत चर्चा करा,
( उदा . वीवेकानंदा च्या सा हीत्या संदर्भात )………….
त्यांची तोंडे हींपूटी होतात आणी अर्थातच अगोचर(दीसेनाशी) होतात…
बापरे, पण त्यासाठी आंग्ल भाषा यायला हवी ना मला? ती पण येत नाही त्याचं काय?
मला पण खुपवेळा असे नमुने भेटतात. मी विमानाने जमीन सोडली की माझ्याकडचे कुठलेतरी पुस्तक काढतो. बहुदा वपु किंवा सुनीताबाईंचे एखादे पुस्तक असते. ते बघितले की शेजारचा जर मराठी असेल तर त्याची प्रतिक्रिया बघण्यासारखी असते.
विशाल
हे नेहेमीच होतं. मराठीला एकदम डाउन मार्केट ची ट्रिटमेंट देणारे मराठी माणसंच आहेत.
पुर्वी जेट मधे मराठी पेपर्स मिळायचे, हल्ली मिळत नाहीत.मी जर मुंबई हुन निघणारी फ्लाईट असेल तर नेहेमीच मागतो. न चुकता कंप्लेंट मेल पण मेल पाठवतो नेहेमी जर मराठी पेपर मिळाला नाही तर.
बर्याचश्या मोठ्या कंपन्यात असे अनुभव अनेकदा येतात, गुजराती लोकांच्या भाषाभिमानाचे कौतुक वाटते, काही ठिकाणी तर ही लोक ऑफ़िसच्या कामाबद्दल सुद्धा गुजरातीतच बोलतात, कोणतीही लाज न बाळगता आणि आपल्या लोकांना साधा मराठी पेपर दिसला तरी लाज वाटते, तेच खरे पावटे आहेत… त्यांना सुनावले हे योग्यच केले
गौरव,
हे मी पण पाहिलं आहे, गुजराथी लोकं शक्य तेवढं गुजराथीमधेच बोलतात. पण दोन मराठी माणसं नेहेमी इंग्लिश मधेच बोलणं सुरु करतात.
कारे बाबा, मराठीच ना तू? मग कसलं रे हे तुला डाउनमार्केट वाटतंय इथे मराठी पेपर असणं? आणि मराठी म्हणजे पावटे, म्हणजे स्वतःच्या घरच्या लोकांना पण पावटेच म्हणतोस की काय तू?
हे तुम्ही चक्क बोललात…सहीये….असच पाहीजे ह्या लोकांना….मी कांचन शी १००% सहमत आहे…ओळख दाखवायला का लाज वाटअते कळअत नाही..बाकी तुमच्या बोलन्याने चपराख नक्कीच बसली असेल नां…[माझ्या बरहा ला आज अंगात आले आहे so जास्त काही लिहित नाही][:p]
एक कन्फेशन:- सकाळ, प्रहार , आणि लोकमत मी घेतले होते वाचायला, म्हणून त्यांची कॉमेंट मला लागु होत होती त्या वेळेस , आणि म्हणूनच जास्त झोंबली. नाहीतर कदाचित मी पण दुर्लक्ष केलं असतं, एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच..
आधी मी पुण्यात एका नामांकित आय टी कंपनीत काम करत होते. तेव्हा चे दोन अनुभव आठवले. कंपनीची बस थांब्या जवळ एक पेपरवाला बसत असे. सकाळी कधी लवकर पोचले तर मी त्याच्या कडून साप्ताहिक सकाळ/ लोकप्रभा वगेरे मासिके घेत असे. त्यामुळे जरा ओळखीचा झाला होता. एकदा मी त्याच्याकडे दाक्षिणात्य भाषेतील पेपर पाहिले. त्यावर त्याने सांगितले की हल्ली मराठी पेक्षा हेच पेपर घेणारे लोक जास्ती आहेत.
त्या ही आधी मी चेन्नई मधे काम करत असे. प्रत्येक कॅन्टिन मधे एक छोटे दुकान असते जिथे वेफ़र्स चॉकलेट्स शीत पेये वगेरे मिळतात. तामिळ लोक दुकानदाराशी तामिळ मधेच बोलत असत. जेव्हा आमच्या सारखे बिगर तामिळ लोक इंग्लिश मधे बोलत असत तेव्हा दुकानदार इंग्लिश मधे बोलत असे. पण हेच जेव्हा मी पुण्यात आले, अशाच कॅन्टिन मधल्या दुकानात एक १७- १८ वर्षाचा पोऱ्या कामाला होता. मी त्याला फ़क्त ह्याची काय किंमत आहे असे मराठीत विचारले, तर एकदम वस्सकन ओरडला, हिन्दी मे बोलो ना, मराठी नही आता.
मी चकित, हेच त्याला नीट शब्दातही सांगता आले असते, पण नाही. तो बिहारी होता हे वेगळे सांगायला नको.
माझा नवरा पंजाबी आहे. त्यामुळे आता चन्डिगड ला बऱ्याच वेळेस जाणे होते. तिथे ही जिकडे तिकडे बिहाऱ्यांचा सुळसुळाट आहे. पण सर्व अस्खलित पंजाबी बोलतात. तिथे त्यांची हिन्दीत बोलायची टाप नाही. कारण पंजाबी माणूस कितीही शिकलेला पैसेवाला असला तरी मातृभाषेतच बोलतो. जो पर्यन्त मराठी लोकांना मराठीत बोलायची लाज वाटते तोपर्यन्त हे असच चालणार.
लिना
ब्लॉग वर स्वागत.
दाक्षिणात्य लोकं आवर्जून तामिळ वगैरे पेपर घेतात. आमच्या घरासमोरच्या घरात ( खरं तर फ्लॅट म्हणायला हवं) मल्याळम पेपर येतो रोज- आणि तो पण मराठीच्या आधी !! ते लोकं गाणी पण तामिळ/ मल्याळम ऐकतात , हे पण मी नोट केलंय.
पंजाबी लोकांना भाषाभिमान तर आहेच. कितीही श्रीमंत पंजाबी असला तरीही- हे निरिक्षण मी पण केलेले आहे.
मस्त सुनावलंत काका,
मी आय टी मध्येच आहे, आणि इथे हैदराबादला मराठी मुलांसोबत मराठीच बोलतो, आवर्जुन…
आनंद
असो. पुन्हा असे करणार नाहीत अशी आशा आहेच.
धन्यवाद. अरे त्यांची कॉमेंट खूप बोचली…
अजून एक गोष्ट, हल्ली प्रत्येक शहरात खाजगी एफ एम चॅनल्स आहेत. चेन्नई मधे सर्व चॅनल्स तमिळ आहेत. पण महाराष्ट्रात एक ही मराठी एफ एम चॅनल नाहिये.
लिना
यावर पुर्वी एक पोस्ट लिहिले होते. http://wp.me/pq3x8-1kE
एक पत्रही पाठवले होते, मनसे आणि शिवसेनेला.
नुकतीच कौशल इनामदार यांनी मराठी चॅनल सुरु करण्याची घॊषणा पण केली होती . त्याचं पुढे काय झालं ते कळलं नाही.
Very nice post sir ….
One more thing. Whenever you are getting call from any call center for any thing, start talking in Marathi, we are there client. When we have to talk to any american client we talk to him/her in US accent, cause they are our client. This will make them to hire Marathi people there.
I have started it.
Now every one start call with me in Marathi.
I am writing this in English because i don’t know how to write comment in Marathi on websites, apologies for it.
उमेश
ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार.
तुमची कल्पना पण योग्यच आहे. तुम्ही अमृतमंथन हा ब्लॉग पाहिलात का? अवश्य पहा. माझ्या ब्लॉग रोल मधे त्याची लिंक आहे दिलेली.
मराठी बोलले, तर त्यांना नक्कीच मराठी बोलणारी मुलं ठेवावी लागतील. मी पण मराठी मधेच बोलण्याचा आग्रह धरतो.
नागेश, उन्मेष,
हि लिंक चेक करा इथे तुम्ही मार्लीश(मराठी+इंग्रजी मध्ये–संदीप खरे) मध्ये त्य्पे करा ते मराठी फोन्ट मध्ये दाखवेल… मी हेच वापरतो…
http://marathi.changathi.com/
नागेश, उन्मेष,
हि लिंक चेक करा इथे तुम्ही मार्लीश(मराठी+इंग्रजी मध्ये–संदीप खरे) मध्ये टाईप करा ते मराठी फोन्ट मध्ये दाखवेल… मी हेच वापरतो…
http://marathi.changathi.com/
ऋषी
हे मला पण माहिती नव्हते.
धन्यवाद
“मराठी + इंग्लिश = मिन्ग्लिश” असे अधिक योग्य वाटते .
वामन
धन्यवाद.
ब्लॉग वर स्वागत!
तुमचा मुद्दा पटला.
Saheba,
Bharpur divasani blog vachala,
Nehami pramane solid aahe,
Mala marathi typing yet nahi pan english madhyech lihit aahe,
Me yethe banglore madhye aahe, Iethlya lokanch matrubhashevarch prem pahile ki vatat apali loke kadhi sudharnar…………………………………………….
नागेश
बरेच दिवसानंतर आलास! कस्ं काय सुरु आहे? बंगलोरला सेट झाला असशिलच आता.
अहो काका.
हे नेहेमीचंच आहे. मराठी माणसे एकमेकांशी ऑफिसात इंग्रजीत आणि बाहेर हिंदीत का बोलतात हे न कळलेलं कोडं आहे.
पण हे नुसतं मराठीच नाही इतरही अनेक ठिकाणी होतं..भारतीय म्हणून.
मी एकदा अमिरातीत तिकिट फुकट अपग्रेड झाल्याने बिझनेस क्लासला गेलो होतो. नी नेहमीच भारताबाहेर आवर्जून हिंदी पेपर घेतो. एअर होस्टेस माझ्याकडे पेपरांचा ट्रे घेऊन आली. मी थोडीशी दाढी बाळगतो, त्याकारणे कदाचित तिचा गैरसमज झाला. तिनं मला विचारलं की अरेबिक पेपर की इंग्रजी. मी चटकन हिंदी म्हणालो, तिच्या चेहर्यावरचे भाव लगेच बदलले.
काय बोलणार. आपलं ते कार्टं, दुसर्याचा तो बाब्या, ही आपली मनोवृत्ती बदलायला हवी!
विद्याधर
आमच्या ऑफिसमधे मात्र आम्ही सगळे मराठी लोकं अगदी आवर्जुन मराठीतच बोलतो. हिंदी फक्त इतर प्रांतियांशीच बोलायला वापरली जाते. इथे गुज्जु पण चांगलं मराठी बोलतात.
जाम भारी लिहिलंयत.. बरं झालं त्यांना चांगलं सुनावलंत. हल्ली (माझ्यापेक्षा) तरुण पोरापोरींमध्ये अजून एक अशीच फॅशन आहे. सगळेजण एकमेकांना भेटले किंवा फोनवर बोलताना वगैरे की थेट हिंदीतच चालू होतात. दोघेही मराठी असतात आणि दोघांनाही ते माहित असतं तरीही.. “हिंदी कशाला?” असं विचारलं की म्हणतात काही नाही असंच टाईमपास..
मी हैद्राबादला सत्यममध्ये असताना बरेचदा लोक तेलुगुतून सुरु व्हायचे.. अगदी ऑफिशियल मीटिंग मध्येही. मी शक्य तितक्या तुच्छ स्वरात त्यांना वास्तवाची जाण करून द्यायचो
हेरंब
ऑफिशिअल मिटींग मधे पण आपल्याकडे मराठी वापरली जाईल लवकरच ( आमच्या इथे बरेचदा वापरली जाते ). दक्षिण भारतियांचं आपल्या भाषेवर प्रेम असतेच, आणि त्यांना आपण कट्टर आहेत म्हणुन शिव्या घालतो.
नमस्कार काका,
म्हणजे पुन्हा सिद्ध झालं की मराठीचा नुकसान मराठी माणूसच करतो.
खरा प्रश्न हा आहे की, असं का ? , मराठी बाबतीतच असं का घडावं. का एक समाज नाही का बनू
शकत ?. ही घटना आठवली की , तो पानीपतच्या लढाइतील किस्सा आठवला. त्यात मुघल राजा फ़ेरफ़टका मारतांना मराठींचे वेगवेगळ्या जेवण्याचा चुली पाहुन ,मंत्र्याला म्हनतो की “हम तो ये जंग जीत चुके हय।”. आणि तसंच झाल.
यावर उपाय काय.
क.लो.अ.
अक्षय
प्रतिक्रियेकरता आभार. जे उदाहरण दिलंय ते पहिल्यांदा वाचलं. अगदी चपखल बसतंय या परिस्थिती मधे.
अगदी अगदी
माझ्या कॉलेज मध्ये मराठी पोर अन एक बर्फयांची मोबाईएल वॅन सतत हिन्दी मध्ये बोलत असते
सुरवातीला वाटलं असेल दुसर्या राज्यातील कोणीतरी नंतर कळलं ह्या देशपांड्यांच्या आहेत.
मी कधी बोलत नाही त्यांच्याशी पण जेंव्हा बोलतो तेंव्हा त्या हिंदीत सुरवात करतात मी मराठीत
मग त्या आपल्या येतात मराठीत.
सागर
पुण्याला तरी पुर्वी मराठी आवर्जुन बोललं जायचं, पण आता तिथे पण जर हिच परिस्थिती असेल तर, ती बदलायचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
महेंद्र, खूप चांगल केलसं रे. झापलच पाहिजे अश्या लोकांना. पावटे असे स्वत:च स्वत:ला म्हणवून घ्यायचे म्हणजे कमालच झाली ही. इथे तर दोन मराठी एकमेकांसमोर आले की हमखास साहेबाचीच भाषा बोलतात.
श्री
मला खरंच त्यांचं बोलणं खूप लागलं. कारण मी मराठी पेपर घेउन बसलो होतो नां, त्यामुळे मलाच ते पावटे म्हणताहेत असे वाटत होते. म्हणुन थोडं झापलं त्यांना.
me kuthetari wachale hote ki marathi manasat nyungand asato, tasech tyachyat pardharjine pana jast asato
mazi barich warsh telagu bangali up bihari ya lokant geli teva pahila ki tyanchyat apapsat bhandane asatat ppan jeva dusre koni tya group madhil kona baddal kahi bolale tar te lagech ek hotat pan marathi matra marathichi baju ghene tasech tyala madat karane ya goshtit pudhe yet nahi ter marathichya virodhat janyat dhanyata samajto.
tasech itar lok swatachi festival publicaly pan enjoy karatat pan marathi tyat sudha mage asatat
हर्षा
प्रतिक्रियेकरता आभार. निरिक्षण अगदी बरोबर आहे. मराठी लोकांमधे एकी नाही हेच खरं कारण आहे, नाहीतर कोणाची मजाल आहे इथे येउन मराठी लोकांनाच नावं ठेवायची.
त्या मराठी मुलांची मनोवृत्ती पाहून खेद वाटला. आपणच मराठीची कास सोडली तर अमराठी लोकांना काय दोष देणार? तुम्ही झापून चांगलच केलं.
निरंजन
प्रतिक्रियेकरता आभार. तशी वेळ पुन्हा येउ नये हीच इच्छा.
बरंच झाले सुनावले ते
कर्मदरिद्री म्हणता येईल अशा लोकांना अतिशय संताप जनक गोष्ट आहे हि …
कुठल्या मुहूर्तावर जन्माला आले होते काय माहित………….
सागर
हा लेख लिहिण्याचा मूळ उद्देश साध्य झालाय. जनजागृती होणं महत्वाचं. आभार.
kasala aanand jhalay mala tumhi je kahi kelat te waachun. kharach. he aani asach waagal na pratyek thikani tarach thoda far farak padel.
shewati ‘te’ ithe ghusale, sthirawale, dokyawar basale karan aapan basu dil.
Swatahchi bhasha , saunskruti kami lekhanyachi wrutti itakya tharala kuthalkyach samajat geleli nasel.
सोनल
धन्यवाद. ही जाणिव सगळ्य़ां मधे निर्माण व्हावी एवढीच अपेक्षा. मातृभाषेची लाज वाटायाला लागली की ती भाषाच संपणार..
नमस्कार महेन्द्रजी,
छान लेख आहे…अगदी खरी परिस्थिति आहे…पण विचार करण्यासारखे आहे की मराठी माणुस हा साधारणतः मध्यम्वाग्रिय असतो,नौकरी करतो….बर्याचदा त्याच्या डोक्यावर बसणारे हे हिंदी किव इतर भाषिक असतात..म्हणून कदाचित हा न्यूनगंड आलेला असेल…पण सुसंकृत,सभोव्तिची जाण असणारे लोक हे आपल्या भाषेविषई जागरूक असतात..सांगायला वाईट वाटते पण अर्ध्या हल्कुंदात पिवले होनार्यन्मध्ये अशी वृत्ति (आपल्या भाषेचा अनादर करण्याची) दिसून येते…
इकडे दिल्लीला मराठी कार्यक्रम अवर्जुन होतात,तय सगले लोक मराठीशिवाय कही बोलत नाहीत…फार छान वाटते…पण महाराष्ट्रात गेल्यावर बहुतेक मराठी लोक हिंदीत बोलतात,डोक संतापते तेव्हा..कदाचित घर की मुर्गी दाल बराबर हा पण विचार त्याला करनिभुत असेल..
अजुन एक विचार करण्यासारखे आहे की वर्त्तमानपत्रांची quality पण चांगली असायला हवी ना..विमंतालावर जर कदाचित महाराष्ट्र times,लोकसत्ता वगैरे उत्तम लिखाण असणारे वृत्पत्र असतील आणि उथल/फालतू लिखाण असणारी वृत्तपत्र नसतील तर निश्त्चिताच लोकांचा दृष्टिकोण बदलेल…
अतुल
सकाळ, लोकमत आणि पुढारी होते. तिन्ही पण चांगले पेपर्स आहेत. इथे कुठली वृत्तपत्रे आहेत त्या पेक्षा त्या मुलांची वागणूक खटकली.
कोल्हापुरला तर पुढारी सगळ्यात जास्त वाचला जातो. सकाळ, मुंबई आणि पुणे. लोकमत संपुर्ण महाराष्ट्रभर.
प्रतिक्रियेसाठी आभार.
मला वाटायचं आमची तरूण पिढी सुद्न्य आहे… नवविचारांची कास धरलेली असली तरी आपल्या भाषेचा, योग्य परंपरांचा अभिमान आहे आम्हाला. पण आता आमच्यामधीलच काही जण स्वत:च्याच लोकांना पावटे म्हणून संबोधून स्वत:च्या मातृभाषेचा अपमान करत असतील तर परभाषिकांकडून अन्य अपेक्षा करणे व्यर्थच…. पण बरं झालं तुम्ही त्यांना चांगली समज दिलीत ते…अशांची कान उघडणी ही झालीच पाहिजे.
तृप्ती
जेंव्हा शक्य होत असेल तेंव्हा मराठी बोलणे, आणि वाचणे मला आवश्यक वाटते. जर आपणच आपली भाषा विसरलो तर आपली पुढली पिढी कशी काय लक्षात ठेवेल?आणि आपल्याच लोकांचा अपमान आपलेच लोकं करायला लागले की अजूनही वैताग येतो. प्रतिक्रियेसाठी आभार.
होय अगदी बरोब्बर आणि मस्तं केलंत. माझा पण असाच अनुभव आहे. मराठी माणुसच आपल्या मातृभाषेशी बेईमानी करतांना दिसतो. इथे परदेशात राहून तर हे खुपच अनुभवते आहे. महाराष्ट्र मंडळात बरीच मंडळी इंग्रजी बोलतांना दिसातात. पेपर वाचनाचे तर अगदी बरोबर आहे. मराठी लोक सोडुन बाकी भाषीय लोक बरोब्बर आपल्या मातृभाषेचा पेपर वाचतांना दिसतात.
विमानतळावर वगैरे बदल होणे अतिशय आवश्यक आहेत. तिथे काम करणारे लोक परदेशीय लोकांशी इंग्रजीत बोलतात तर ठीक पण बाकीच्याशी काय गरज.?
आजकाल युनिकोड मुळे देवनागरी मधे लिहीणे शक्य असलेले लोक पण सगळ्या दुर उगीचच इंग्रजीची टिमकी गाजवतात. ऑरकुट किंवा फेसबुक किंवा तत्सम जागी पण मराठी लोकांमधे पण इंग्रजीचे वर्चस्व आहे. पुढारलेले दाखविण्याची हौस उगीचच….
माझ्या मते तर इंग्रजी आपली भाषा नसुन पारतंत्र्यात आहोत असे दर्शविणारी भाषा आहे. जोपर्यंत आपण इंग्रजांची भाषा गरज नसतांना वापरू तोपर्यंत आपण स्वतंत्र देशात आहोत असे वाटणारच नाही.
मी कटाक्षाने मराठीतच बोलते. पण समोरचा माणुस कळत असुनही बरेचदा इंग्रजी मधे बोलतो.
परदेशात जेंव्हा कोणी परप्रांतीय भेटतो तेंव्हा मला असे वाटते की हिंदी मधे बोलावे. पण नाहीच बोलत. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण मिळुन मराठी साठी लढा देण्याची गरज आहे. करु या मिळुन प्रयत्न आपल्या मायमराठीला उच्च स्थानावर बसविण्याचा…
युनीकोड मुळे तर मराठी लिहिणं अतिशय सोपं झालंय. शक्य तेवढ्यावेळेस मराठी टाइप करावं. मराठीचा शक्य तेवढा वापर ठेवला तर नक्कीच फायदा होईल.
प्रिय दीपिका जोशी ’संध्या’ यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले पत्र वाचून अतिशय आनंद झाला. एवढा तीव्र स्वाभिमान आजच्या पिढीत (माझ्याहून आपण बर्याच तरूण असणार असे वाटते) टिकून आहे; हे कळून खूप समाधान वाटले.
{{माझ्या मते तर इंग्रजी आपली भाषा नसुन पारतंत्र्यात आहोत असे दर्शविणारी भाषा आहे. जोपर्यंत आपण इंग्रजांची भाषा गरज नसतांना वापरू तोपर्यंत आपण स्वतंत्र देशात आहोत असे वाटणारच नाही.}}
आपले म्हणणे १०० टक्के पटले. तशाच प्रकारचे विचार मांडणारे खालील लेखही आपणा सर्वांना आवडतील अशी खात्री वाटते.
“स्वातंत्र्यापूर्वी जेवढा तीव्र स्वाभिमान आपल्यात होता, त्याच्या शतांशानंही तो आज उरला नाही, हे कारण आहे का? इंग्रजी बोलण्यात, घरांची नावं इंग्रजी ठेवण्यात, हवामान प्रतिकूल असूनही इंग्रजांसारखी वेषभूषा करण्यात, निमंत्रणं इंग्रजीतून काढण्यात, अंतर्गत पत्रव्यवहार इंग्रजीतून करण्यात, समिति-वृत्तांत इंग्रजीत देण्यात, नाना प्रकारांनी दास्यवृत्ती टिकवण्याचा, वाढवण्याचा, पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा, संक्रामित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचं पाहणं, आमच्यासारख्या वृद्धांना खंतावून जातं.”
वरील परिच्छेद खालील दुव्यावरील प्रा० राईलकरांच्या लेखातून घेतला आहे.
http://amrutmanthan.wordpress.com/2010/04/19/खरंच-आपण-स्वतंत्र-झालो-आह/
“जगभरात स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ केवळ आपले शासन आपण निवडणे एवढा संकुचित नसून आपल्या देशात सर्वत्र आपले शासनव्यवहार, समाजव्यवहार, न्यायसंस्था, संसदव्यवस्था, ज्ञान, विज्ञान, संज्ञापन, साहित्य, कला, छंद, व्यवसाय, उद्योग, रोजगार अशा मानवीजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ’स्व’-तंत्र प्रस्थापित करणे म्हणजेच प्रामुख्याने आपली संस्कृती, आपली भाषा, आपली परंपरा, आपले विचार (तत्त्वज्ञान), आपल्या रूढी ह्यांचे जतन, प्रस्थापन, संवर्धन व प्रसार करणे इतका विस्तृत असतो.”
वरील अवतरण खालील लेखातून घेतले आहे.
http://amrutmanthan.wordpress.com/2010/04/03/’स्व-तंत्र’-शब्दाविषयीची/
क०लो०अ०
सलील कुळकर्णी
धन्यवाद सलील कुळकर्णी….
वयाचे जाऊ द्या पण अशी मराठी आपली सदैव असावी हे जर आपण आपल्या घरांतुनच सुरू केले नाही तर बाकीच्यांना कुठल्या तोंडाने सांगणार? अशा मताची मी आहे त्यामुळे आधी परप्रांतात असतांना मातृभाषेला जपत व तिचे जतन करत माझ्या मुलांबरोबर तेथील बाकी मराठी मुलांना त्याचे महत्व शिकवायचा सतत प्रयत्न करत राहीले. व ९५ टक्के सफल झाले. आता पुढच्या येऊ घातलेल्या पीढी साठी चा प्रयत्न किती सफल होतो ते बघणे आहे.
मराठी साठी प्रचंड अभिमान बाळगणारे आपले भेटले की खुपच छान वाटतं.
स्वातंत्र्यापुर्वी ज्यास्त स्वाभिमान होता… असेलही.. त्याच स्वाभिमानी लोकांच्या पीढ्या पुढे चालू आहेत पण तेच इंग्रजी भाषेचे गुलाम असतील.. भाषेच्या भांडणाबरोबर पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वतंत्र करण्यासाठी पण लढा होताच. सगळ्या लढ्याच्या शेवटी स्वातंत्र्य मिळाले खरे पण इंग्रज आपला प्रभाव व आपली भाषा मागे सोडन गेलेत व त्याचे महत्व शुन्य करावे इकडे लक्ष दिलेच नाही. त्यामुळे पारतंत्र्य संपल्यासारखे वाटतच नाही. व गुलामच राहीले आहेत. जर आधी स्वाभिमान ज्यास्तं असेल तर तो कमी का झाला असेल? खरंय अगदी विचार करण्यासारखा प्रश्न तुम्ही पुढे आणला आहात.
तुम्ही बरोबर म्हणताय… घरांचीच काय.. हल्ली तर मुलांची पण नांवे इंग्रजी ठेवतात. मराठी शुभेच्छापत्रांचा वापर सध्या बराच दिसतो तर आनंद वाटतो. असो…
शुभेच्छा
उत्तम लेख काका. तुम्ही अगदी योग्यं केलत. दुर्दैवानी प्रत्येकवेळी मला असं करणं जमत नाही. “घरका भेदी लंका ढाए” अशी परिस्थिती असेल तर अमराठी लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे?
प्रिय अभिलाष यांस,
सप्रेम नमस्कार.
तुम्ही तरुणांनीच आता ही जबाबदारी पार पाडायची आहे. महेंद्रसारखे तरूण आपापल्या परीने मायबोलीची सेवा करीत आहेत हे पाहून आनंद होतो.
राग मानणार नसलात तर एक सांगू इच्छितो. “घरका भेदी लंका ढाए” ह्या म्हणीचा अर्थ मला ठाऊक नाही. मराठी म्हण असती तर माझ्या अज्ञानाबद्दल खेद वाटून मी ताबडतोब शब्दकोश काढून अर्थ शोधला असता. पण ही म्हण हिंदी किंवा व्रजभाषा (तुलसीरामायणातील?) वगैरे बोलीभाषेतील असावी. त्या भाषांमध्ये मी प्रवीण नाही. शिवाय जी भाषा आपण बोलत असतो ती योग्य रीतीने बोलावी असे मला वाटते. मराठी बोलताना मराठी चांगली बोलावी, इंग्रजी बोलताना इंग्रजी व तसेच हिंदी, कानडी, गुजराथी, फ्रेंच, जपानी बोलताना ती-ती भाषा शक्य तितक्या योग्य प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते.
आपण आपल्या राज्यात हिंदी भाषेला मोकळे रान दिले आहे. आपणही (विशेषतः मुंबईकर व पुणेकर) सर्वत्र मराठीऐवजी जणू हिंदीलाच महाराष्ट्राच्या राज्यभाषेचे स्थान दिले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातून हिंदी येत असलेला कोणीही उठून महाराष्ट्रात नोकरी घेऊ शकतो किंवा व्यवसाय सुरू करू शकतो. कॉल सेंटर, विक्री विभाग, दुकाने, कार्यालये अशा सर्वच ठिकाणी केवळ हिंदीच्या जोरावर परराज्यातील माणसे आपल्या नोकर्या बळकावून बसतात. तेथील विद्यापीठांत भरपूर टक्केवारी प्रसादासारखी वाटतात. तिथल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ती मंडळी कमी पगारात नोकरी करण्यास किंवा कमी उत्पन्नात व्यवसाय करण्यास तयार असतात. म्हणजेच आपण महाराष्ट्रीय स्वतःहूनच आपल्या बांधवांची बेकारी वाढवतो. त्यांच्या नोकरीची संधी कमी करतो. अर्थात हे इतर स्वभाषाभिमानी राज्यांत चालत नाही. त्यामुळे तेथील राज्यांत उद्योग-धंद्यांचा विस्तार झाला तर भूमिपुत्रांची प्रगती होते. आपल्याकडे नोकर्या, उद्योगधंदे वाढले की ते बहुसंख्येने परकीयांच्या खिशात जातात. महाराष्ट्र शासनाचे कायदेही इतरांप्रमाणे भूमिपुत्रांच्या बाजूचे नाहीत. जे थोडे आहेत तिथेही कोणी ते कायदे गंभीरपणे राबवत नाहीत. इतर राज्यांत तसे केले तर सरकार कोसळेल. आपल्याकडे आपण स्वाभिमानी असणे म्हणजे संकुचितपणा असा खोटा प्रचार करून आपल्या किंवा आपल्या बांधवांच्या पायावर धोंडा मारून घेतो.
वेळ असेल तर खालील लेख वाचून पहावा.
http://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/
आपले विचार कळवावेत.
क०लो०अ०
सलील कुळकर्णी
होय नं.. देवनागरी लिहीण्याचा आग्रह सतत करा लोकांना तरी टस से मस होत नाहीत व शक्य असतांना सुद्धा मिंग्लिश किंवा पुर्ण इंग्रजीचाच वापर करतात..
अभिलाष म्हणतात ते बरोबर आहे.. घर का भेदी च आहे तर कोणाला दोष देणार.. आणि भारतात व ते पण पुणे मुंबई मधेच हे प्रकर्षाने जाणवते की इंग्रजी भाषाच ज्यास्तं बोलली जाते. घराबाहेरच काय पण मराठी घरांमधे ही तेच हाल आहेत.
दक्षिणेला तर ते त्यांच्या भाषेशिवाय बोलतच नाहीत. असो…
इथे तर माझे ह्या विषयावरून वादावादी मधे बरेच शत्रु तयार झाले आहेत. पण मी त्याच माझ्याच ठाम वाटेने पुढे जातेय… प्रयत्नांति यशाची आशा आहे…. मी मराठी माझे मराठी…
प्रिय महेंद्र यांस,
सप्रेम नमस्कार.
आपला लेख वाचला. आवडला. मराठी माणसालाच स्वतःच्या भाषेबद्दल एवढा न्यूनगंड का हे समजत नाही. स्वस्तातील विमानाची तिकिटे घेऊन केवळ मराठी माणसेच प्रवास करतात का? त्यात मद्रासी, बंगाली, पंजाबी, आसामी, अगदी परदेशी (गोरे) नसतात का? परदेशातही स्वस्तातील विमानप्रवासाचा पर्याय उपलब्ध असतो. तिथेही मराठीच जाऊन पोचलेत का?
सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणाहून विमान सुटते तेथील पद्धतीप्रमाणे (बरेचसे) खाद्यपदार्थ देण्याचा व तेथील वर्तमानपत्रे (इतरांबरोबर) ठेवण्याचा अलिखित शिष्टाचार आहे. भारतातून बाहेर जाणार्या आंतर्देशीय विमानात भारतीय पदार्थ व वर्तमानपत्रे तर असतातच; पण चेन्नईवरून उडणार्या देशांतर्गत विमानातही इडली-डोसा किंवा चेट्टिनाड मटण इत्यादी पदार्थ असतात, कलकत्त्याहून उडणार्या विमानात बंगाली मिठाई, चिंगली माछ (कोलंबी) इत्यादी पदार्थ असतात, स्थानिक वर्तमानपत्रेही ठेवलेली असतात. पण मुंबईहून उडणार्या विमानात मात्र महाराष्ट्रीय पदार्थ असत नाहीत व मराठी वर्तमानपत्र मागूनही मिळत नाही. इतर सर्व मोठ्या (मेट्रोपोलिस) शहरांना स्वतःची अशी नक्की संस्कृती आहे; पण मुंबईला मात्र तशी काही नाही असेच मानले जाते. मुंबईची संस्कृती म्हणजे गुजराथी+पंजाबी+मद्रासी+हिंदी संस्कृती. मराठीशी तिचा संबंधच नाही अशी प्रतिमा दृढ झाली आहे व त्याबद्दल आपल्या लेखातील त्या दोन तरूण पोरांप्रमाणेच कोणालाही त्याची खंत वाटत नाही. ही वृत्ती बदलली तर आपण बरेच काही बदलू शकतो.
बडोदे येथील मराठी मंडळींच्याचे मराठीप्रेमाबद्दल मलाही कल्पना आहे. त्यांच्या स्वसंस्कृतीबद्दलच्या अभिमानाच्या निखार्यावर फारशी राख जमलेली नाही. मुंबई-पुण्यातील मराठी माणसांच्या स्वाभिमानाची मात्र पुरती राख झाली आहे. त्यातच थोडीफार धुगधुगी शोधत रहायचे व तिलाच फूंकर घालीत फुलवण्याचा प्रयत्न करायचा. बडोदे व ग्वाल्हेर येथे गेल्या काही पिढ्या स्थायिक असलेल्या आमच्या मराठी कुटुंबमित्रांनी पाठवलेल्या आपल्याकडील लग्नाच्या आमंत्रणपत्रिक अजुनही मराठीतच आढळतात. (दुसर्या भाषेत वेगळ्याही काढल्याही असतील, कल्पना नाही.) पण मुंबई-पुण्यातील बरीचशी मंडळी मात्र हल्ली इंग्रजीतच पत्रिका काढतात. त्याशिवाय त्यांना आपली सामाजिक प्रतिष्ठा (स्टेटस) सिद्ध झाल्यासारखे वाटत नाही. अशा आमंत्रणपत्रिकांतील धेडगुजरी भाषांतरित (थोड्या आपल्या पद्धतीच्या व थोड्या इंग्रजी पद्धतीच्या आमंत्रणाची सरमिसळ असलेली) इंग्रजी भाषा बहुधा विनोदी व चुकीची असते.
असो. आपण आपल्या परीने राखेतील निखार्यांमध्ये धुगधुगी शोधून तीवर फुंकणी मारायचे काम चालूच ठेवू, यशापयशाची चिंता न करता.
क०लो०अ०
सलील कुळकर्णी
प्रिय श्री सलिल
तुमची प्रदिर्घ अभ्यासपुर्ण प्रतिक्रिया वाचली. मी जे डोळे उघडे ठेउन पाहणं सुरू केलं ते तुमचा मेल वाचल्या नंतरच. नाहीतर कदाचित माझ्या नजरेतून पण ही गोष्ट सुटली असती.
लग्नाच्या पत्रिकांच्या बद्दल तर बोलायची सोयच राहिलेली नाही.
इंग्रजी मधे बोलल्याशिवाय आपण सुशिक्षित आहोत हे सिध्द होत नाही अशी काहीशी मराठी माणसांची धारणा झालेली आहे, आणि त्यामुळे ते मराठी बोलणं टाळतात. कालच एक सुंदर साईट सापडली. त्या साईटवर म्हणी वाचल्या. त्यातल्या काही समजल्या काही नाही, पण इतकी सुंदर भाषा आहे आपली हे बघुन खूप छान वाटलं, म्हणुन एक पोस्ट टाकतोय त्यावर, आणि त्या साईटची लिंक पण देतोय.
या लेखाचा उद्देश पुर्ण झाला. थोडीफार जनजागृती झाली , लोकांना जाणिव झाली, समविचारी लोकं भेटले-भरून पावलो.
महेंद्र
अभिप्रायाकरता आभार.
प्रिय महेंद्र यांस,
सप्रेम नमस्कार.
आपण म्हणालात ते अगदी खरं आहे. कर्नाळ्याच्या पक्षी अभयारण्यात गेल्यावर कधीकधी आपल्याला प्रथम फारच थोडे पक्षी दृष्टीस सापडतात. हळूहळू आपल्यालाही पक्षीनिरीक्षणाचा छंद जडला की सवयीने आपलीही नजर आपोआपच तयार होते. मराठीत एक म्हण आहे. चांभाराची नजर नेहमी जोड्यांवर/पायांकडे. त्याचप्रमाणे मराठीच्या केल्या जाणार्या हेळसांडीची/अपमानाची जाणीव झाली की मग आपली नजरही तशीच तयार होते. आधी साध्या गोष्टीही न दिसणार्या नजरेला लहानसहान गोष्टीही दिसू लागतात. नजर, कान सर्वच तयार होतात. (सूचना: bird watching चा आधुनिक शहरी अर्थ इथे अभिप्रेत नाही.)
अन्याय लक्षात आल्यावर शक्य तिथे, यथाशक्ती त्याविरुद्ध कृती करणे हे देखील महत्त्वाचे आहे; जे आपण केलेत व त्याचा दृश्य परिणामही आपल्याला तत्काळ दिसला. अर्थात प्रत्येक वेळी आपल्या कृतीचा योग्य परिणाम होईलच असेही नाही पण तरीही करीत जायचे.
{{या लेखाचा उद्देश पुर्ण झाला. थोडीफार जनजागृती झाली , लोकांना जाणिव झाली, समविचारी लोकं भेटले-भरून पावलो}}
लोकांचे (विशेषतः तरुणाईचे) प्रतिसाद वाचून खूपच आनंद झाला. अर्थात करण्यासारखे काम पुष्कळ आहे. नवनवीन क्षेत्रांत, नवनवीन मुद्दे हाताशी घेऊन मायबोलीचे कार्य करीत राहू.
{{कालच एक सुंदर साईट सापडली. त्या साईटवर म्हणी वाचल्या.}}
आपण कुठल्या संस्थळाबद्दल बोलत आहात याची कल्पना नाही; पण सुमारे वर्षापूर्वी मी अशाच प्रकारे बर्याच म्हणींची यादी दिलेले संस्थळ पाहिले होते. पण म्हणींचे अर्थ दिलेले नसल्यामुळे त्यातील अनेकांची मजा अनुभवता येईना. मराठीमध्ये हजारो (होय, हजारो) म्हणी व वाक्प्रचार आहेत. आणि एका म्हणीने जे विचार स्पष्ट होतात ते एरवी सविस्तरपणे समजावून सांगायला कदाचित पानभर मजकूरही लिहावा लागेल.
क०लो०अ०
सलील कुळकर्णी
सलिल,
मला तरूण म्हणताय? होय, तसा मनाने तरूणच आहे मी . फक्त २४ वर्षाचा , पण पंचविस वर्ष अनुभव असलेला. ( ४९)

म्हणींवरचा लेख पोस्ट केलाय आता. आणि त्या संस्थळाची माहिती पण दिलेली आहे . कमीत कमी लोकांना त्या जुन्या भाषेचा आनंद घेता येणे शिकता यावे म्हणून.
अगदी बाणेदार उत्तर दिलात बघा काका…….मी सुद्धा खूप मराठी लोकांना ओळखतो जे मराठी असून हिंदीचाच जास्त वापर करतात………….परंतु त्यांच्याशी मी फक्त मराठीतच बोलतो….
दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रकार times वाचणार्या मराठी वर्गातच आहे अस नाही … ट्रेन मध्ये सुद्धा आठवड्यातून एकदा तरी २ मराठी माणसे हिंदीतून भांडताना दिसतात……अगदी आमच्या office मध्ये येणारे सर्वाधिक phone calls हे मराठी माणसांचेच असतात पण त्यातले खुप कमी लोक directly मराठीत बोलायला तयार असतात..म्हणजे पहिल्यांदा हिंदीत सुरुवात करतात आणि मग मराठीत……..सवयीचे गुलाम बाकी काय…
प्रिय पुष्पराज यास,
सप्रेम नमस्कार.
’सवयीचे गुलाम’ हे खरंच पण ही सवय देखील मूलतः स्वभावामधील गुलामगिरीच्या भावनेतूनच बनलेली असते.
दीपिका जोशी ’संध्या’ यांना लिहिलेल्या वरील पत्रात मी संदर्भिलेले लेख नजरेखालून घालावे. पहा पटतात का.
क०लो०अ०
सलील कुळकर्णी
अजुन एक कटु सत्य खटकते ते हे की आजकालची तरुण पीढ़ी मराठी संस्कृति,साहित्य,सिनेमा, संगीत म्हणजे down market समजतात.
माझे बरेच मित्र चांगले मराठी सिनेमे पाहणार नाहीत पण दर श्क्रवारी कुठला हिंदी/इंग्लिश सिनेमा रिलीज़ होतो ते नक्कीच संगतील,आणि सिनेमा कितीही रद्दी असला तरी एकदा तरी पाहतील..
मी इकडून दिल्लिवारून त्याना एखादा मराठी सिनेमा च critics फार छान छापून अलाय,तुम्ही पहिला काय तर त्यानी पहिला नसतो आणि त्यांची इच्छा पण नसते बघायची हीच बोम्ब मराठी गानी आणि पुस्तकांबद्दल पण आहे..हेच मराठीचे दुर्दैव….मराठीची सद्य परिस्थिथि,आणि काही चांगले लेख जेव्हा जेव्हा माझ्या वाचनात येतात तेव्हा मी मित्रना आवर्जुन त्यांची लिंक पाठवत असतो…प्रत्येक वेळी अपेक्षा असते की त्यातून काही तरी चांगले निष्पन्न व्हावे ….मी तुमच्या ह्या लेखाची लिंक माझ्या सगल्या मराठी मित्रना पाठवली आणि लेखासबोत वेग्वेगली कमेन्ट पण वाचायला लावली..बघुया लेख आणि कोम्म्नेट वाचून त्याना स्वताची तरी लाज वाटतय का ते…
अतुलजी
इतक्या अंतर्मनापासून लिहिलेल्या अभिप्रायासाठी आभार. मराठी गाणी, नाटकं पहाण्यातला इंटरेस्ट पण संपलाय आता लोकांचा. हिंदी सिनेमांना रांगालाउन पहायला जाणारे आपले प्रेक्षक मराठी नाटकाच्या वेळेस कुठे गायब होतात तेच कळत नाही.
ह्या बाबतित समाज जागरण व्हायला हवे, आपणच आपल्याकडून होईल तेवढा प्रयत्न करीत रहायचे. झालं.
Dear Mahendra,
I am a Marathi (who also studied in Marathi medium) now working outside Maharashtra in a near-total North Indian atmosphere. There are very few Marathis here. But whenever we meet, we enjoy brushing up our Marathi and cracking those rotten Marathi PJs!
However, we are always considerate enough not to use Marathi as a code language between us in front of non-Marathis. It is only a gesture of respect for our collegues, nothing else.
Whenever I am in Maharashtra, even Mumbai, I make it a point to use Marathi in public places. We friends and cousins have great fun going to places frequented by moneyed non-Marathis (NCPA, Taj, etc in Mumbai and Blue Diamond, MG Road etc in Pune) and speaking in street-smart Marathi.
बर झाल त्या दोघांना तुम्ही सुनावलं कमीतकमी परत कधी ते अस बोलणार नाही.
मराठी असल्याचा अभिमान प्रत्येकाला असायला हवा आणि मराठीतच बोलायला हवे.
रमेश
ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार .
Namaskar,
Tumhala Ashcharya vatel pan kaal sakali me Mumbai – Nagpur (Air India) flight madhe marathi aikale ani marathi bolalo te hi flight pursershi………dhanya zalo.
Nehami chhan-chhan baya ani tarun bapye asata vimanat ani fakta english aikayala milate / bolave lagate. Ya flight madhe flight purser, ground crewshi marathit bolat hota. “aale ka sagale, koni rahile ajun”, “chala, yeto” vagaire. Aikun chhan vatale. B/F nantar chaha gheun ala tevha me tyala Marathitach “Chaha nako….coffee gheto me” ase mhatalyavar, “Chalel, Aanato” ase shuddha marathit uttar milale. On flight Marathicha vapar me pratham anubhavala.
Bagdogra (Pashchim Bangal), Vishakapatanam (Andhra Pradesh) ya Airports var Bengali ani Telugu madhech sarva suchana asatat.
Magil Athavadyat mazhya vimanat mazhya pudhech Vijay Darda (Rajyasabha Khasdar) ani R R Patil basale hote…..doghanche sambhashan askhalit marathit chalu hote, Vijay Darda marathi nasunahi. Anek amarathi manase chhaan marathit bolatat….apalyach marathi manasat marathicha nunganda aahe.
संजीव…
जेंव्ही तुम्ही सांगताय की मी मराठी आहे आणि माझे शिक्षण पण मराठी मधे झालेय..तर इथे पण मराठी मधेच लिहायला हवे नं.. आपण सगळे मराठी भाषेला मान मिळाला पाहिजे आणि आपण मराठियांचे मराठी भाषेला जपण किती महत्वाचे आहे ह्यावर चर्चा करतो आहोत.
आम्ही पण तुमच्याप्रमाणे उत्तर भारतात बरीच वर्षे काढली आहेत पण मजेखातर मराठी भाषा कधीच वापरली नाही. आम्ही होतो तेंव्हा तर धडाक्यात महाराष्ट्र मंडळ चालवित होतो. आपले सण साजरे करत होतो. मुलांना मराठी सणांची परंपरांची माहिती व्हावी हाच उद्देश होता. जितके मराठी लोक असतील तितक्याच लोकांमधे मराठी भाषेतच बोलणे हा नियम करायला हवा.
मुंबई किंवा महाराष्ट्रात येऊन मराठी बोलण्याचा नियम करता.. जरा हास्यास्पद आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमधेच इंग्रजीला प्राधान्य दिले जातेय ह्यासारखे दुःख नाही. हेच सगळे कमी करायचे आहे. गरजच असेल तिथे मराठी हिंदी … जी भाषा आवश्यक आहे ती बोलायला हरकत नाही हो… असो….
वर राजन महाजन म्हणतात तसेच आम्ही जेंव्हा कुवैत एअरवेज ने भारतात येतो तेंव्हा मुंबईला विमान जातेय आणि इकडुन सगळ्या भाषांचे लोक विमानात असतात त्यामुळे विमानात सगळ्या सुचना इंग्रजी अरेबिक बरोबर हिंदी मधे पण दिल्या जातात. खुप छान वाटतं. त्यांचा अनुभव एयर इंडिया चा आहे. मराठी -हिंदी जे काय असेल पण बोलायलाच हवे व छानच आहे. पण त्यांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे कारण विनाकारण इंग्रजी चे महत्व.. जिथे नको तिथे. मराठी चा न्युनगंड बाळगणारे फक्त मराठी लोकच आहेत.
शुभेच्छा…
Ms Joshi,
I respect what you are saying. My comment is in English because of font trouble and not due to any complex! My 2-year old daughter is just about learning to speak and she only speaks Marathi words. After all, Marathi is all she gets to hear in the house! But being outside Maharashtra means my usage of Marathi beyond my house is nearly zero.
By the way, I did not understand what exactly was ” hasyaaspad”about my insistence on speaking in Marathi in Pune and Mumbai !
It may annoy you, but I find it hugely amusing when I speak in Marathi to some (very obviously) non-Marathi persons in these cities and they get all fidgety and uncomfortable! I then really pile it on by continuing to speak in Marathi!
तुमच्या पुन्हा इंग्रजीमधल्याच उत्तराबद्दल धन्यवाद.
थोडे फार कळले पण तुम्ही इतके कठिण इंग्रजी शब्द वापरले आहेत की माझ्यासारख्या मराठमोळ्या स्त्रीला काही ते कळले नाहीत.
माफी असावी.
तुमची मुलगी मराठी बोलतेय हे तर उत्तमच आहे. आणि घरांत राहुन ते शिकवणे आपलेच कर्तव्य आहे. उत्तर भारतात किंवा महाराष्ट्राबाहेरच म्हणा नं की घराबाहेर मराठी शुन्यच असणार. पण मातृभाषा घरांत राहुन शिकताच येते हे माझे अनुभवाचे बोल आहेत.
अमराठी लोकांशी मराठी बोलणे कधीच शक्य नाही व असा आग्रह ही नाही व तो आपण धरू पण शकत नाही.
शुभेच्छा
अहो जोशी बाई, तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला तर एकदम अपराधी वाटतय ! अहो मी खरच मराठी आहे ! फ़क्त typing चे वान्दे आहेत! पण होऊन जाऊ दे!
जर मी पुण्याबिण्यात असेन तर मराठी का बोलू नये? समोरच्याने कळून घ्यायला नको?
On the other hand, उत्तरेत असताना मी कधीही मराठी ही गुप्त code म्हणून वापरत नाही. जर समोरच्यापैकी एका जरी माणसाला मराठी येत नसेल, तर मी Hindi/English बोलतो.
माझी बायको गुजरातमध्ये जन्मली, वाढली आणि शिकली. ती मराठी आणि गुजराती दोन्ही सारखेच कौशल्याने बोलते.
You got to be loyal to the culture around you.
By the way मला अनुस्वार कसा type करायचा ते माहीत नाही हे वरच्या मजकुरावरून कळले असेलच!
मराठी मधे कॅपिटल एम केला की अनुस्वार येतो बरहा मधे.
अर्रर्र असे अपराधी वगैरे वाटुन घेण्याची काहीच गरज नाही हो.
आता बाकी मला मस्तं वाटलं की झक्कास पैकी मराठी व ते पण देवनागरी…. मानलंच तुम्हाला मी.
होय अगदी खऱंय… जेंव्हा कोणी एक जरी अमराठी असेल तरी आपल्याला हिंदी कडे वळावंच लागतं.
पुण्याला किंवा महाराष्ट्रात नक्कीच मराठी बोलायचेच. मी फक्त हेच बघते आहे सध्या की मुंबई पुण्याला मराठी पेक्षा इंग्रजी कडे कल ज्यास्त दिसतो नं. आमच्या सारख्या ५०शी उलटलेल्या बायकांना पण काय झालंय तर इंग्रजीचाच वापर करतांना दिसतात.
मुलं परदेशात असतील व आजकाल परदेश भ्रमण भरंच वाढले आहे त्याच्या पण असर असु शकतो. जे काय असेल….
परप्रांतात जन्म झाला की खरंच कधी कधी फायदा पण होतो बघा तुमच्या सौ. सारखा. हिंदी मराठी गुजराती व इंग्रजी तर नक्कीच येत असेल. सहीच एकदम…
शुभकामना..
तुमच्या पुन्हा इंग्रजीमधल्याच उत्तराबद्दल धन्यवाद.
थोडे फार कळले पण तुम्ही इतके कठिण इंग्रजी शब्द वापरले आहेत की माझ्यासारख्या मराठमोळ्या स्त्रीला काही ते कळले नाहीत.
माफी असावी.
तुमची मुलगी मराठी बोलतेय हे तर उत्तमच आहे. आणि घरांत राहुन ते शिकवणे आपलेच कर्तव्य आहे. उत्तर भारतात किंवा महाराष्ट्राबाहेरच म्हणा नं की घराबाहेर मराठी शुन्यच असणार. पण उत्तर भारतातच राहून मातृभाषा फक्त घरांत राहुन-बोलुन शिकताच येते हे माझे अनुभवाचे बोल आहेत. जन्म उत्तर भारतातच झालेल्या व सुरुवातीची १२ वर्ष तिकडेच गेलेल्या आमच्या मुलांना एकदम शुद्ध मराठी लिहीता वा वाचता येत होते. ही अतिशयोक्ति नाही.
अमराठी लोकांशी मराठी बोलणे कधीच शक्य नाही व असा आग्रह ही नाही व तो आपण धरू पण शकत नाही.
शुभेच्छा
चुकुन ते दोनदा उत्तर दिले गेलेय…
Deepikaji, Namaskar !
English madhe marathi tankalekhan karane he fakt velechi bachat mhanun me karato.
me thodese lihito, tyacha blog hi aahe. tithe me marathi madhe lihito pan te karatana khoop vel lagato (me google-transliteric vaparato). kadhi kadhi marathimadhe rupantarit zalele 2-3 paricched achanak udun jatat. pan
tyasathi me tevadha vel kadhato. te shakya nahi zale tar chakka lihun kadhato ani scan karun blogvar takato. ithe abhipray nondavatana tevadha vel dene shakya hot nahi.
Marathivar sarvanchech prem aahe……tyachi tulana hou shakat nahi. Tumche kami ani maze jaast ase kase mhananar ? Devalat na janare sarvach bhakta nahit he shakya aahe ka ?
Rajan Mahajan
राजन
शक्य झाल्यास बरहा डाउन लोड करुन घ्या. खूप सोपं आहे टाइप करणे बरहा वापरुन. http://baraha.com ही साईट आहे.
राजन महाजन….
तुमच्या कुठल्याच गोष्टीवर माझा आक्षेप तसाही नव्हताच. देवनागरी युनिकोड लिहीणे आता सहज शक्य आहे पण तसे जमत नसेल तर जसे तुम्ही मराठी लिहीले आहे ते पण चांगले.
महेंद्र यांनी सांगितलेले बरहा करुन बघा.. तुम्हाला तुमच्या लेखनांत पण त्याचा खुपच फायदा होईल.
मी इंडिक आयएमई वापरते पण ह्यात कीबोर्ड थोडा वेगळा वेगळा आहे. पण माझ्या कामासाठी फारच उपयुक्त आहे म्हणुन मी ह्याची संवय केली आहे. असो..
तुम्ही म्हणता तसे मराठी वर सगळ्यांचेच प्रेम असायलाच हवे ते आजकाल इंग्रजीच्या प्रभावामुळे कमी झाल्याचे दिसुन येते म्हणुन थोडी ही चर्चा आहे. सगळ्याच्या अनुभवातुन पण एकेक नवीन नवीन ऐकायला मिळतंय…
बर्याच ठिकाणी बरेच वेळा असे वाद होतात व संभवतात पण. त्यातुन काही चांगले निष्पन्न झाले तर उत्तमच.
देवळाचे उदाहरण जोरदार दिलेत. देवळात न जाणारे भक्त असतीलच.. पण देवळात जाणारे सुद्धा किती मनोभावे जातात हा पण प्रश्नच आहेत. म्हण तेव्हढ्यासाठीत तर तयार झालीये नं… ‘धड देवळात अन चित्त खेटरात…’ असो…
धन्यवाद…
शुभेच्छा
आणि हो.. देवनागरी समजा जमत नसेल तर राजन महाजन सारखे मराठी तर नक्कीच लिहु शकाल…. (आधीच्या लेखनाच्या पुढे दोन वाक्य ही..)
चर्चा वाचून तात्पर्य काढावेसे वाटले,आता तेवढेच सांगतो, बाकी स्वत:ला शहाणे ,सुसंस्कृत आणि काय ते मॉडर्न (आधुनिक म्हटले तर तेही कळणार नाही अशी माणसे) वगैरे समजणारे मराठी लोक खूप आहेत (विशेषत: मुंबै पुण्यात आणि अर्ध्याहळकुंडात पिवळी झालेली अमेरीका वगैरे पाश्चिमात्य देशात जाऊन आलेली मंडळी)…त्यांना ह्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.(म्हणजे चर्चेने)
तात्पर्य= मराठी माणूस स्वत:ला कितीही पुढारलेला,शिकलेला,सुसंस्कृत वगैरे समजत असला तरी त्याला शिक्षणाने काय साध्य होते हे अजून उमगले नाहीये, एक आर्थिक फायदा सोडला तर.* स्वाभिमान,आत्मसन्मान वगैरे गोष्टी ह्या दूसर्यांचे अनुकरण करण्यात असतात असा आणि असे अनेक गैरसमज करुन आता सगळीकडे चर्चा करत सुटलाय कि मी ज्या भाषेत जन्मलो ,वाढलो आणि इथपर्यंत आलो ती ह्या अवस्थेत का? म्हणजे त्याच्या शिक्षणाचा उपयोग काय झाला? शून्य.
एवढे शिकुनही त्यास स्वत:चा स्वाभिमान जागृत करण्यासाठी त्या अशिक्षीत लोकांची (भैय्या व इतर कामगार वर्गातील परप्रांतीय) उदाहरणे द्यावी लागतात.ज्या इंग्रजीचा टेंभा मिरवीत फिरत आहे त्या इंग्रजांनी ७२ देशात राज्य केली, अनेक गावचे पाणी प्यायले पण स्वत:ची संस्कृती आणि भाषा कधी सोडली नाही, तर ती इतरांना शिकवून जगात स्वत:चे साम्राज्य उभारले,त्यांच्यात नव्हती अशी लाचारी वृत्ती.दूसर्यांकडून बाळकडू घेऊन सुधारण्याइतके “अशिक्षीत-पुढारलेले” लोक इतर कुठेही पहायला मिळत नाहीत, जितके ह्या मराठी साम्राज्यात आढळतात.असो.काहीही बोला किंवा सांगा वृत्ती हि प्रत्येकाची मालमत्ता आहे, ती कशी आणि कुठे वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
“इंग्रजांनी ७२ देशात राज्य केली, अनेक गावचे पाणी प्यायले पण स्वत:ची संस्कृती आणि भाषा कधी सोडली नाही, तर ती इतरांना शिकवून जगात स्वत:चे साम्राज्य उभारले”
हाच मुद्दा महत्वाचा आहे. इंग्रजी चांगले म्हणून मराठीला वाळीत टाकले पाहिजे किंवा मराठी डाउन मार्केट असे नाही हे कधी समजणार लोकांना??
ज्यांचे ब्रेनवॉश झालेले आहे अशा लोकांना सांगून काय उपयोग.
मराठी माणूस म्हणजे कोण माहित आहे का??
१. जो हिंदी चित्रपट आवडीने पाहतो
२. जो हिंदी गाणी विकत घेतो,गुणगुणतो,गातो,त्यात प्राविण्य मिळवितो.
३. जो दिवसभर हिंदी एफ.एम.वाहिन्यांवर तासनतास हिंदी बडबड आणि गाणी ऐकण्यात वेळ घालवतो.
४. जो मित्रांशी हिंदी चित्रपटातील डायलॉग्स मारून बोलतो,किंवा चलता है,क्या बात है,असे शब्दप्रयोग वारंवार वापरतो.
५. जो १०० मराठी माणसांत एक कोणताही अमराठी (ज्याला हिंदीही येत नसेल असाही) आला कि लगेच हिंदीत बोलायला सुरूवात करतो.
६. जो दुकानदारला मराठी येतच नसेल असे समजतो, व भैय्या ये कितने को दिया विचारतो.
७. जो अनोळखी माणसाशी सर्वप्रथम हिंदीत ओळख करुन घेतो नंतर वाटल्यास हिंदीत भांडतोही.
८. जो आपल्या घरातले सोडले तर बाहेर जगात हिंदीच लोक जास्त रहातात असे समजून घराबाहेर मराठी शक्यतो बोलण्याचे टाळतो.
९. ज्याला त्याची भाषा मराठी आहे का असे एखाद्याने विचारल्यास हळूच हो म्हणतो किंवा काही वेळेस अगदीच नाईलाज म्हणून सांगावेसे वाटले तर या…बट आय डोन्ट नो मराठी मच..इ.अशी काहीतरी थाप मारतो.
१०. ज्याला हे माहित नसते कि एकेकाळी भारताचा १/३ भाग हा मराठी साम्राज्याचा भाग होता आणि जवळपास १० कोटी लोकांना मराठी बर्यापैकी समजते.
११. ज्याला हे माहित नसते कि मराठी जगातली १५ वी मोठी भाषा आहे.
१२. ज्याला हिंदी विषयात मराठी पेक्षा अधिक गुण मिळतात व मराठी भाषा खूप कठिण आहे असे वाटते.
* आता तुम्हीच सांगा मराठी माणसाला एवढ्या ठिकाणी जर हिंदीच लागत असेल तर त्याला मराठी म्हणण्याचा अधिकार आहे काहो?? कशाला हवी त्याला महाराष्ट्रात मराठी ??
चेतन
अवघड प्रशन.. १०० टक्के अनुत्तरतणीय़.. काहीच उत्तर दिले जाउ शकत नाही…