मासिकांचे खरे काम म्हणजे चांगले साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे. पण माझ्या माहितीमध्ये अशी काही लोकं आहेत की जी या मासिकांच्या कडे पूर्णपणे एक पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहतात. कोणालाच माहीत नसलेले वार्षिकांक , दिवाळी अंक काढणे म्हणजे पैशाची बेगमी. काही प्रथितयश लेखकांना हाताशी धरून त्यांच्याकडून हलवाई जसा बुंदी पाडून घेतो त्याप्रमाणे लेख, कविता पाडून घ्यायच्या , आणि जाहिरातदारांकडून जाहिराती मिळवायच्या- की झालीच वर्षभराची कमाई. वार्षिकांक काढणं हा एक धंदा झालेला आहे हल्ली.
तसंही मासिकांचे सोनियाचे दिवस गेले आजकाल . एकेकाळी किर्लोस्कर, मनोहर, स्त्री वगैरे चांगल्या मासिकांची चलती होती. बहुतेक सगळे सुशिक्षित लोक ही मासिकं वाचायची, पण आता त्यापैकी किती ’मासिकं’ ही मासिक स्वरूपात प्रसिद्ध होतात हे पण मला माहिती नाही. या शिवाय माझी आवडती मासिकं म्हणजे अमृत, विचित्र विश्व, नवल, आणि मुलांचे मासिक! ह्या रिडर्स डायजेस्टला डोळ्यासमोर ठेवून काढलेल्या मासिकांची खूप चलती होती.वाचनालयात नंबर लावून मिळायचं विचित्र विश्व वाचायला.
एक गोष्ट निश्चितच खरी आहे की पूर्वी जसे आमचे वडील वगैरे ’प्रसाद’ ( य. गो. जोशींचे) किंवा अमृत, दर महिन्याला घरी येईलच म्हणजे सगळ्यांना वाचायला मिळेल म्हणून वार्षिक वर्गणी भरायचे, तशी हल्ली फार कमी लोकं वर्गणी भरून मासिकं वाचतात- ( कारण काहीही असो, चांगली मासिकं हल्ली निघत नाही वगैरे वगैरे, आणि जर कुठली चांगली असतील तर आम्हाला ठाऊक नाही म्हणून ) ह्याच कारणामुळे मराठी मासिकाला चांगले दिवस आहेत असे वाटत नाही.
नुकताच एकदा आयडीयलला गेलो होतो , तिथे समोर मांडून ठेवलेल्या पुस्तकांमध्ये एक पुस्तक दिसले, आणि त्याच्या लेखकाचे नांव पाहून अजिबात विचार न करता ते पुस्तक उचलून घेतले. भानू काळे!! अंतर्नाद या मासिकाचे संपादक! साहित्यिक वर्गात अंतर्नाद हे मासिक माहीत नाही असा माणूस विरळाच! गेली पंधरा वर्ष एकांगी लढा देत दर महिन्याला न चुकता आपलं मासिक काढत असतात.आजच्या बाजारात असलेल्या असंख्य मासिकांच्या मधले एक उत्कृष्ट मासिक म्हणून याचा उल्लेख करावा लागेल.
अश्या परिस्थितीत अंतर्नाद हे मासिक चांगलं ’सकस साहित्य’ चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरु करण्यात आले होते. डावे- उजवे, दलित- सवर्ण, ग्रामीण -शहरी, स्वतःला व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त – अनुपयोगी , प्रस्थापित- नवोदित असे कुठलेही साहित्यबाह्य निकष न लावता केवळ चांगले साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंतर्नादने सातत्याने केलेला आहे.
अंतर्नाद मध्ये बर्याच लेख-मालिका प्रसिद्ध झाल्या, त्यांची नंतर पुस्तकं पण छापण्यात आली. शान्ता शेळके यांचे कविता स्मरणातल्या , लक्ष्मण लोंढे यांचे लक्ष्मण झुला. या मासिकाची एक आठवण सांगतांना श्री भानू काळे लिहितात, कित्येक वर्ष सातत्याने आपले नांव न लिहीण्य़ाच्या अटीवर एक पूर्णं पृष्ठ जाहीरात अरुण किर्लोस्करांकडून दिली जात होती. जाहीरात देताना त्यामध्ये कंपनीचा लोगो पण वापरू नये ही अट घातली होती. चांगल्या कामासाठी चांगले लोकं नेहमीच पुढे येतात. या व्यतिरिक्त पण नियमीतपणे जाहीरात देणारे बरेच लोक आहेत.
मराठी मासिक, ज्यामध्ये लेख छापून आल्यावर कुठल्याही प्रथितयश लेखकाला जे समाधान वाटतं, ते केवळ अंतर्नादच्या याच गुणांमुळे. कित्येक वर्ष शान्ता शेळके यांच्या कवितांवर लेख छापून येत होते . त्याचंच एकत्रित निघालेले पुस्तक वर दिलेले कविता स्मरणातल्या. अंतर्नादचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे असलेले व्याकरण सल्लागार यास्मिन शेख. त्यामुळेच या मासिकामध्ये व्याकरणाच्या चुका नाहीत असे भानू काळे आवर्जून लिहितात.
लेखकांची पळवापळवी हा तर नेहमीचा प्रॉब्लेम आहे. पण तरीही प्रत्येक लेखाखाली त्या लेखकाचे नांव आणि फोन नंबर दिले जातात. या अंकाची दहा वर्ष पूर्णं झाल्यानंतर लिहिलेल्या लेखामध्ये भानू काळे यांनी लिहिले आहे की इतकं सगळं असूनही आज अंतर्नादचे वर्गणीदार फक्त १५६० च्या आसपास आहेत. एका वाचकाने म्हटले होते की जर प्रत्येक वाचकाने फक्त एक अजून नवीन वर्गणीदार मिळवून दिला तर हे मासिक चालवणे थोडे सोपे जाईल. दर महिन्याला जवळपास १५६० वर्गणी दारांच्या अधिक ८० प्रतीभेट म्हणून पाठवल्या जाणार्या प्रती छापल्या जातात. इतक्या कमी प्रती छापल्यानंतर त्याचा ब्रेक इव्हन येणे फार कठीण आहे हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही.
त्यांच्या एका लेखातील एक वाक्य ” मासिक छापणे हे एक श्रेयविहीन ( थॅंकलेस ) काम आहे” मनाला खूप लागलं. इथे या लहानशा लेखातून या चांगल्या मासिकाचे वर्गणीदार व्हा म्हणून सगळ्या मराठी लोकांना आवाहन करतो. अंतर्नादची वार्षिक वर्गणी फक्त ४५० रुपये आहे आणि पत्ता खाली दिलेला आहे. या पत्यावर वर्गणी साठी चेक पाठवू शकता.
-
-अंतर्नाद
सी-२, गार्डन इस्टेट जवळ
वायरलेस कॉलनी जवळ
औंध, पुणे.. ४११००७
E mail :- bhanukale@gmail.com














ह्या मासिकाबद्द्ल माहिती नव्हती… धन्यवाद…. एक वाचक वाढला नक्की….
सारीका
धन्यवाद.. खरंच छान असतं लिखाण या मासिकातलं.. तुम्हाला आवडेल नक्की!
“प्रथितयश लेखकांना हाताशी धरून त्यांच्याकडून हलवाई जसा बुंदी पाडून घेतो त्याप्रमाणे लेख, कविता पाडून घ्यायच्या”…….. दुर्दैवाने ऑनलाईन साहित्यात पण काही काही अश्याच प्रवृत्ती दिसुन येतात, मागे आपला विषय पण झाला होता गुलमोहोर, आंबे पाऊस वगैरे कवितांवर……. अभिव्यक्तित कर्मकांडे आली की मग ते हळु हळु निरस वाटतात, वरतुन तुम्ही नमुद केलेले हलक्या लेखणीचे हे दिवाळी अंक सहज “कॅटरीना” “दिपिका” वगैरेंचे मोहक फ़ोटो वापरतात…. आता ह्या कॅटरीनाला धड हिंदी नाही जमत तिला मराठी काय डोंबल कळणार आहे? ते सोडा कोणी काही म्हणत नाही म्हणुन ह्यांनी त्या अभिनेत्रीच्या प्रतिमेचे हक्क घेतले आहेत असे आपण धरुन चालु ,पण जर असे नसले तर….. कोणी कॉपीराईट्स इन्फ़्रिंज्मेंट च्या केसेस केल्या तर ह्या निर्लज्जांचे काही नाही पण मराठी भाषा ,साहित्य व एकंदरीत समाजाची किती बदनामी होईल हा विचार करुनच कसेतरी होते!!!!!!!!!,अंतर्नाद कधी मी वाचले नाही पण तुमचे इतके मनापासुनचे रेकमेंडेशन आहे तर नक्की वा्चणार…..
गुरुनाथ
सब्स्क्राईब कर… छान अंक असतो . मी दर महिन्याला एक तारखे नंतर वाट पहात असतो नवीन मासिकाची.
नक्कीच पुण्यात गेल्यावर तिथला पत्ता देऊन करेन, मला काहीतरी हवेच असते माहितीपुर्ण नवे…
अरे पोस्टाने पाठव ना वर्गणी. पुण्याला कशाला जायला हवं त्यासाठी?
I tyhink that the “ego” of a reader is also important as well as the maketing is utterly a must.
I do read “antarnaad” is very very good , but they lack the above thing. Secondly some (poona mumbai) people think ( that the pune and mumbai is maharashta )that they are too great to and they dont reach the readers in rest area of the maharashtra.is antarnaad falling in this circle ???????
राजीव
त्यांचं मार्केटींग अजिबात नाही, ज्या लोकांना ठाऊक आहे, त्यांना, आहे, इतरांना अजिबात काही माहिती नाही या बद्दल! या मधे फक्त मुंबई पुणे नाही, तर मराठवाडा , विदर्भातल्या लेखकांचे पण लेख असतात . मासिक विकत घेऊन वाचणं, किंवा एखादं चांगलं पुस्तक आहे, ते विकत घेऊन वाचणं या मधे मराठी लोकं अजूनही फार कमी पडतात असे मला वाटते.
yaat ata puNya mumbai chya lokanna dosh deun nakkee kay karyabhag sadhala kaLala nahee. ekuNach sagaLya marathi massekanna shaharee bhagat pratisad jasta asato, tee prasidhdha hee puNya mumabichech lok adhiktar kartaat ; pun subscribe kela tar dusrya gavat anka paThavat naheet asa hota ka?? what a biased comment! and totally unnecessary in this context.
मासिक खरंच छान आहे. आपण जेंव्हा सिनेमा पहायला जातो, तेंव्हा दोनशे रुपयांचे तिकिट काढतोच ना? मग एका मासिकाची वर्गणी भरायला का मागे पुढे पहातो आपण हेच मला समजलं नाही. आपल्याला सगळं काही विनमुल्य वाचायची आवड निर्माण झालेली आहे. नेट वर सगळी पुसतकं असतातच फ्री डाउनलोडींगसाठी.. पण …
“मासिक छापणे हे एक श्रेयविहीन ( थॅंकलेस ) काम आहे” to say this is ok…. but its a etch of the publisher too.
( dont take this as a -ve comment)
तू कोणाच्या कॉंटेक्स्ट मधे लिहितो आहेस, हे मला लक्षात आलंय..
पण तो विषय इथे नको..
नमस्कार,
अंतर्नाद बद्दल एक अतिशय महत्त्वाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. संपादन व मुद्रितशोधनाबद्दल. या पैलूबाबत तर सद्यस्थितीतील सर्व मासिकांमध्ये अंतर्नाद हे उत्कृष्ट मासिक आहे. जोडीला कदाचित् युनिक फीचर्सचे’ नवा अनुभव’ येईल.
केदार
ब्लॉग वर स्वागत.. प्रतिक्रियेसाठी आभार.
माझे पण हेच मत आहे. सध्या तसे ललित वगैरे पण बरं असतं, पण अंतर्नादला पर्याय नाही.
काका, खूप महत्वाची आणि चांगली माहिती दिलीत. घरी आई-बाबांकरता सबस्क्राईब करतो नक्की.
हेरंब
नक्की आवडेल सगळ्यांना.
नक्की कर. चांगली मासिकं आपल्यालाच वाचवायला हवी.
मस्त,छान,सुंदर आवडला,वाचनात एक चागली भर पडली,धन्यवाद,
्महेश
मनःपूर्वक आभार..
काका..
पोस्ट वाचली आणि आपण काही तरी हरवलंय ही जाणीव झाली.. माझी आई नागपुरातल्या एक शाळेत ग्रंथपाल म्हणून काम करते. लहानपणा पासून आम्हाला वाचनाची आवड लावली तिने.. आम्हाला इतर पुस्तकां सोबत ती किशोर सारखी मासिक आणायची. आम्ही मोठ झालो.. इतर वाचत राहिलो.. पण मासिकं मात्र सुटली.. विशेषतः मराठी मासिकं.. पोस्ट वाचल्या वाचल्या ठरवल की सब्स्क्राईब करायचच.. उद्याच चेक पाठवून देतो…
अमित
नक्की पाठव चेक. खरंच सुंदर मासिक आहे घरात मासिकं पुस्तकं असली, की मुलांना पण वाचायच्या सवयी लागतात. फुलबाग पण मस्त असायचं..
हे खूपच छान मासिक आहे. मी वर्गणीदार आहे अंतर्नादचा. दर महिन्याला प्रत्येक प्रकारचं साहित्य (कथा, लेख, अनुभव ई) वाचायला मिळतंच शिवाय इतरही बरीच माहिती मिळते. सि.डी देशमुखांची पुस्तक योजना, विलास चाफेकर नावाच्या अदभुत कार्यकर्त्यांच्या संस्थेची ओळख, अनेक कविंची ओळख करून देणारी, नुकतीच पूर्ण झालेली, हेमंत गोविंद जोगळेकरांची मालिका ई खूप काही. मला वाटतं तुमची ही पोस्ट वाचलेल्यांपैकी निम्म्यांनी तरी सदस्यत्व स्विकारावं.
क्षितिज
माझी पण तिच इच्छा आहे. पंधरा वर्ष पुर्ण झाली आता हे मासिक सुरु होऊन. आज पर्यंत एकही अंक असा नाही की जो वाचतांना कंटाळा आला. हे पोस्ट लिहीण्याचा एक उद्देश हाच होता की जास्तित जास्त लोकांपर्यंत ह्या मासिकाची माहीती कळावी.
मि पण अंतर्नाद चि नियमित वाचक आहे. छोता असला तरी प्रत्येक पान वाचनीय असते. आयडियलमधे एक लायब्ररी आहे’विश्वास’ तिथे सगळि उत्तम पुस्तके आणी मासिके वाचायला मिळतात.
अरुणा
किती लोकं सबस्क्राईब करतात ते कोण जाणे., पण माझी मात्र इच्छा आहे की कमित कमी ५० तरी नवीन सब्स्क्रिप्शन्स मिळाव्या..
मी आजच झाले वर्गणीदार.
क्रांती
जवळपास ९५३ लोकांनी हा लेख वाचलाय. ५० नवीन वर्गणीदार मिळाले असतील तरी या लेखाच्या लिहीण्याचे सार्थक झाले म्हणायचे. तूम्हाला नक्की आवडेल हे मासिक.
मी नेहेमी म्हणतो, मला चांगलं लिहिता जरी येत नसलं तरी चांगलं वाचायला मात्र आवड्तं. म्हणूनच आरडी आणि अंतर्नाद नेहेमी वाचतो. चांगलं मासिक चालू राहिलं पाहिजे म्हणून आपलाही हातभार लागावा म्हणून हे पोस्ट लिहिले होते. किती फायदा झाला कोणास ठाऊक!!.
माझं मत थोडं वेगळं झालंय. अंतर्नादच्या दर्जाबद्दल माझ्या मनात कणभरही संभ्रम नाही. अंतर्नादच्या जन्मापासून किंवा फारतर तेव्हापासून काही महिन्यांच्यात आमच्याकडे हा अंक येऊ लागला. नेमाने वाचते मी. पण हल्ली वाचकांच्या पत्रव्यवहारातच अर्धा अंक भरलेला असतो. पारदर्शकता म्हणून हे ठीक असले तरी ते थोडे जास्त होतेय असं माझं मत.
नीरजा
ते बाकी खरं आहे, प्रत्येकच पत्र ते छापतात. जवळपास चार पान खर्ची पडतात त्यामधे. पण इतर लेख मात्र वाचनीय असतात हे नक्कीच. प्रतिक्रियेसाठी आभार..
ब्लॉग खरच मस्त आहे. एखादा पोस्ट वाचून थांबणं निव्वळ अशक्य होऊन बसतं. नि:संशय पणे चांगले लिहिता तुम्ही.
भानू काळ्यांचा ‘बदलता भारत’ नावाचा पुस्तक पण वाचा. globalisation मुळे बदललेलं भारत सरकार आणि मग वाढत्या industrialisation मुळे झालेला भारतातल्याच विविध राज्यांच्या जीवनशैलीतला बदल फारच अचूक टिपलाय त्यांनी ! नक्की वाचावं असं.
मिलिंद
ब्लॉग वर स्वागत.. बदलता भारत वाचलेले नाही. आजच पहातो आयडियलला मिळेल तर.
प्रतिक्रियेसाठी आभार.
चेकने वर्गणी पाठविताना फक्त रु. 450 च पाठवावे लागतात का ? किंवा वटणावळिसह चेक पाठवावा लागतो ?