
द लास्ट सपर.. ( फेसबुक वरून)
राजाभाऊ सकाळी उठले, आणि पेपर मधे ’वर्षाला फक्त ६ गॅस सिलेंडर्स सवलतीच्या दरात मिळतील’, नंतर मात्र दामदुप्पट पैसे मोजावे लागतील अशी बातमी वाचली, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. क्षणात त्यांचं बालपण डोळ्यांसमोर तरळलं. ओली लाकडं आणल्या गेली म्हणून धुराने ओले झालेले डॊळे पुसणारी आई आठवली.
राजा भाऊंच्या घरी ओटा नव्हता, गॅस नव्हता ( त्या काळी कोणाच्याच घरी गॅस नव्हता, श्रीमंत लोकांकडेच असायचा स्टोव्ह) “- तर चुलीवर फोडलेली लाकडं वापरून स्वयंपाक केला जायचा. लाकडं आणायचं काम काकांच असायचं. आई पाटावर बसून स्वयंपाक करायची, आणि आम्ही समोर पाट-पाणी घेऊन जेवायला बसायचो. हे दृष्य सगळ्यांच्याच घरी लहानमोठ्या प्रमाणात विदर्भात दिसून यायचं. चुलीची पण बरीच उस्तवार करावी लागायची. सकाळी उठल्यावर शेणाचे पोतेरे घेऊन चूल सारवून तयार केली जायची. हळद, कुंकू वाहिल्या शिवाय चूल पेटवली जायची नाही . एखाद्या वेळेस जर लाकडं ओली आली की मग स्वयंपाक करतांना धुराने खोकून तिचा जीव नकोसा व्हायचा. हातातल्या फुंकणी ने लाकडावर फुंकर मारतांना आईचा होणारा कासावीस झालेला चेहेरा अजूनही आठवला आणि राजा भाऊंचं मन उगाच भरून आलं.
ज्या दिवशी संध्याकाळच्या फार जास्त काही करायचं नसेल तर त्या वेळेस कोळशाची शेगडी वापरली जायची. स्वयंपाक घरात आई स्वयंपाक करतांना तिच्या गळ्यात मागून हात घालून झुलतांना तिला त्रास होत असेल, राजा भाऊंना पोळेल, म्हणून तिला भीती वाटायची आणि मग ती ’मेल्या पडशील ना, भाजून घेशील स्वतःला’, म्हणून त्यांना दूर करायची- आणि जर ऐकलं नाहीच तर हातातल्या फुंकणीने एक फटका पण द्यायची. चुली वर एका बाजूला ’वैलावर” वरणाचं भांडं शिजायला ठेवलेलं असायचं. मुख्य भागात, आधी भाकरी, पोळी किंवा भात शिजवला जायचा.
गेल्या कित्येक वर्षात वरण आणि भात वेगवेगळा शिजवला होता का असं विचारलं तर कदाचित उत्तर देतांना खूप विचार करून उत्तर द्यावं लागेल गृहिणीला. पूर्वीच्या काळी राजा भाऊंच्या घरी एक पितळेचा कुकर आणला गेला होता. तेंव्हा राजाभाऊंच वय असेल ५-६ वर्ष. तो कुकर म्हणजे पण नाविण्य़ होतं, एक मोठा डब्या सारखा, आणि त्या मधे पाणी घालून त्यात डाळ, तांदुळाची भांडी ए्कावर एक ठेऊन चुलीवर ठेवले की एकदम दोन्ही शिजवले जायचे.डाळ तांदुळ एकदम शिजवले जातात याचं आश्चर्य खूप दिवस वाटायचं. घरी कोणी आईच्या ओळखीच्या काकु आल्या की तो कुकर दाखवला जायचा. त्याला शिटी वगैरे काही नसायची. पण लवकरच प्रेशर कुकर मिळायला लागला, आणि ह्या कुकर चं नाविण्य़ संपलं. घरोघरी स्वयंपाक घरातून शिट्यांचे आवाज ऐकू येऊ लागले .
दिवस कसे पटकन बदलत जातात. आमच्या पिढीने जितकं यांत्रिकीकरण पाहिलं आणि अनुभवलं तितकं आमच्या आधीच्या पिढीला पहायला मिळालं नाही. ’वाटणासाठी” पाटा वरवंटा वापरला जायचा, तर कुटायला खलबत्ता. कोथिंबीर मिरची ची चटणी वाटतांना थोडं मीठ घेतलं की वाटणं सोपं पडतं हे आईनेच सांगितलं होतं राजाभाऊंना. सणाच्या दिवशी आईला बरेचदा राजाभाऊ स्वयंपाकात मदत करायचे .
कोणाचा उपवास असला की मग त्या दिवशी दाणे कुटायला खलबत्त्यात घेउन कुटताना खाण्याची मजा यायची. अजूनही खलबत्त्यात कुटलेला दाण्याचा लाडू राजाभाऊ मिस करतो. नंतर ते एक दाणे बारीक करायचं यंत्र आलं ,आणि खलबत्ता ओट्याखालच्या कोपऱ्यात दुर्लक्षित होऊन पडला.दाणे कुटणे आणि खोबरं किसणे हा आवडीचा उद्योग होता राजाभाऊंचा. या मिक्सरने खोबरं किसणे इतिहासजमा झालंय़.
सकाळी पाणी तापवायला एक तर तांब्याचा बंब किंवा जर लाकडं नसतील तर मग भुशाची शेगडी सर्रास वापरली जायची. भुसा म्हणजे लाकडं कापताना सॉ मिल मधे खाली पडणारा लाकडाचा भुरका..शेगडी मधला एक लोखंडी पाइप लावून त्या भोवती भुसा दाबून भरला की मग मधला पाईप काढून घ्यायचा, आणि शेगडी तयार व्हायची. मधल्या भागात निखारा ठेवला , की पटकन पेटायची शेगडी. हे शेगडी भरायचं काम राजाभाऊंचंच! एकदा पेटवली की सगळ्यांच्या आंघोळीचे पाणी तापवून व्हायचे.
घाई – गर्दी ची वेळ असली, की मग आईची चिडचिड व्हायची. भाज्या चिरण्यासाठी ’चॉपिंग ट्रे आणि सुरी’ नव्हती, तर विळी वर भाजी चिरली जायची . सुरी फक्त खाटकांनी वापरायची असते (!) असा विचार होता आईचा.कोथिंबीर खूप बारीक चिरण्या मुळे आईच्या अंगठ्यांना विळीच्या ब्लेड वर दाबल्या जाऊन नेहेमी चिरे पडलेले असायचे. आता दिवस बदलले, मिक्सर आलं, अगदी नकळत प्रत्येक गोष्टीसाठी कुठलं तरी यंत्र वापरणे सुरु झाले. खवणे, कुटणे, दळणे सगळं काही मिक्सर/ग्राइंडर मधे केलं जायला लागलं. स्वयंपाक तोच, फक्त पद्धती मधे फरक पडत गेला. प्रत्येक गोष्ट सोपी होत गेली
राजाभाऊंच्या लहानपणीचा काळ ( म्हणजे राजाभाऊ ५-६ वर्षाचे असताना,)युद्धोत्तर काळ होता, नुकतंच चायना युद्ध संपलं होतं .सगळ्या वस्तूंची टंचाई होती. साखर, तांदूळ वगैरे तर फक्त काळ्या बाजारातच मिळायची. नंतर लवकरच रॉकेल पण शॉर्टेज मधे गेलं आणि रॉकेल मिळणं म्हणजे एक कठीण कर्म होतं. फक्त चूल पेटवण्या पुरतं जरी मिळालं तरी नशीब अशी परिस्थिती होती. ’प्रायमस” कंपनीचा पितळी स्टोव्ह आमच्या घरी होता. त्या स्टोव्हची पण एक वेगळीच उठाठेव करावी लागायची, पेटवण्या पूर्वी गरम करण्यासाठी म्हणून एक काकडा असायचा, तो रॉकेल मधे बुडवून गळ्यात हार घातल्या सारखा त्या बर्नर वर घातला की स्टोव्ह कसा पटकन पेटायचा. कधी तरी बर्नर मधे अडकलेला कचरा काढायला म्हणून एक पिन पण असायची. रॉकेल च्या शॉर्टेज मुळे स्टॊव्ह फक्त सकाळी आणि दुपारी चहाला वापरला जायचा. या पितळी स्टोव्ह शिवाय अजून एक म्हणजे ’वातींचा स्टोव्ह’ पण असायचा. त्याचा आवाज नसल्याने शांतपणे जळत रहायचा तो. दुपारचे तीन चार ची चहाची वेळ झाली घरोघरी स्टोव्हचे आवाज ऐकू यायचे.
हळू हळू स्टोव्ह अडगळीत गेला आणि त्याची जागा गॅसच्या शेगडीने घेतली. त्या शेगडीला रबरी ट्युब असते, म्हणून राजाभाऊंचे तीर्थरूप कित्येक वर्ष सोवळ्याच्या स्वयंपाकासाठी गॅस वापरू देत नसत -खरं म्हणजे ते तर गॅस विकत घेण्याच्या पूर्ण विरोधात होते, पण नंतर काळाची गरज म्हणून कॉम्प्रोमाईज केले.
हळू हळू दिवस बदलत गेले. जमिनीवर बसून स्वयंपाक करायची पद्धत कधीच इतिहास जमा झाली . ( म्हणूनच अर्थ्रायटीस चा त्रास वाढलाय का आजकालच्या पिढीला?). राजाभाऊंनी उगीच आठवून की आपण शेवटचं मांडी घालून जमिनीवर कधी बरं बसलो होतो?? नाही आठवत.. ..कदाचित सहा महिने तरी झाले असतील.
स्वयंपाक केला की एकदाची सगळी भांडी समोरच्या खोलीतल्या डायनिंग टेबल वर नेऊन ठेवले, की जेंव्हा ज्याला वाटेल तेंव्हा तो जेवून घेतो. प्रत्येकाच्या वेळा तशा वेगवेगळ्याच असतात जेवण्याच्या. एक म्हण आहे,” द फॅमिली विच डाइन्स टुगेदर स्टेज टुगेदर” पण तरीही ….. स्वयंपाकघरातल्या यंत्रां सोबत घरातली माणसंही यंत्रा प्रमाणे वागू लागली आहेत. आयुष्य इतकं धकाधकीचे झाले आहे, की हल्ली डायनिंग टेबलवर सगळ्यांनी मिळून एकत्र जेवायला बसण्याचे दिवस संपले आहेत. ज्याला जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा तो जेवून घेतो. कुटुंबातले सगळे एकत्र कधी जेवले तर रविवार सोडून इतर दिवस आठवत नाही.
राजाभाऊंना आ्ठवलं , जेंव्हा मनमोहन पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, तेंव्हा मिडीयाने त्यांच्या पत्नीला विचारले की तुम्हाला काय वाटते, तर त्या म्हणाल्या होत्या, की “आता तरी गॅस सिलेंडर भाव वाढवू नये म्हणजे झाले” पण मनमोहन सिंगनी काही ऐकलेले दिसत नाही. चांगली शिक्षा करणार आहेत त्यांना त्यांची बायको..
या पुढे लाकूड मिळणे पण सोपं नाही, रॉकेल तर कधीच मिळत नाही, मायक्रोवेव्ह वापरायचं, तर इलेक्ट्रिसिटीचे पण भाव खूप वाढले आहेत- कारण एमएसईबीची वितरण व्यवस्था पण तर प्रायव्हेट कंपन्यांना आंदण दिलेली आहे.
आता मनमोहना साठी एकच प्रश्न आहे राजा भाऊंच्या मनात, तुम्ही घरगुती सिलेंडर्स कार साठी, हॉटेल साठी वगैरे वापरली जातात, म्हणून भाव वाढवले आहेत असे म्हणता, अहो मग त्या चोरीच्या सिलेंडर विक्रीवर आळा घाला ना , गॅस कंपनी सरकारची, डिस्ट्रिब्युटर्स सरकारचे…. मग प्रॉब्लेम काय आहे? पण हे सगळं न करता, सामान्य जनतेला वेठीला का धरतो आहेस रे बाबा? सगळ्या ऑइल कंपन्या सरकारीच तर आहेत, मग थोडा प्रॉफिट कमी का करत नाहीस रे तू?” गप्प बसलाय मुग गिळून तो मनमोहन.. राजा भाऊंना स्वतःचाच राग आला..
” अरे बाबा, आम्ही सामान्यांनी खायचं तरी काय?? कोळसा?” …….. पण लगेच त्यांना आठवलं, छे छे.. तो पण त्यांनीच तर खाऊन टाकलाय ना.













सुपर्ब पोस्ट.. संयत शब्दांत फटकारे.. शेवटची ओळ तर भारीच
हेरंब,
धन्यवाद.
फारच छान. तुम्ही नमूद केलेल्या कित्येक गोष्टी अजूनही आमच्या गावी वापरल्या जात आहेत. चूल फुंकणी, पाटा वरवंटा, भुसा, बंब आणि बरच काही. यावर्षी २ वर्षांनंतर गणपती साठी गावी चाललो आहे. गणपती निमित्त असून गावी चुलीवरचं जेवायला मिळेल याचा अधिक आनंद आहे.
अभिषेक
गावाकडे अजूनही बऱ्याच गोष्टी अस्तित्वात आहेत, पण हल्ली शहरीकरणाचे वारे तिकडे पोहोचल्यामुळे काही गोष्टी नामशेष झाल्या आहेत.
nemi sarkha saras post


majhya lahan pani me majhya aji-ajobankade stove pasun survat pahili aahe …amchya gavi tevha gas navta …hava aasel tar talukyala jaycha
pan chuli varcha jevan gavi baryach da khala …chavishta aasta …pan kashta kiti padtat
pan shevatcha muda agdi khara aahe …charya- pasun kolsa pariyat sagla khalay aaj kalchya rajkarni lokani
parat chul vapraychi vel aali nahi mhanje jhala
सुहास
चुलीवरचं जेवण कितीही चवदार असलं तरीही त्याची किंमत घरातल्या स्त्रियांना चुकवावी लागायची. धुरामुळे फुफुसाचे रोग तर हमखास व्हायचे. बरेचदा वाटतं , इतकी मोठी किंमत खरोखरच आवश्यक आहे का?? एखाद्या वेळेस गम्मत म्हणून ठिक आहे, पण रोजच चुलीसमोर बसायचे म्हणजे अवघड काम आहे.
ekdam barober …..kharach kathin aahe …..je banavtat tyanach mahit kiti tras aahe ..
kadhitari thik aahe
एक्झॅक्टली.. माझ्या आधीच्या पिढी मधे बऱ्याच स्त्रिया टिबी ने मृत्युमुखी पडायच्या- एक प्रकारे त्या चुली पासून सुटका झाली हे बरंच झालं म्हणायचं. अॅव्हरेज वय हे जवळपास २० ते ३० वर्षांनी वाढलंय स्त्रियांचं..
khup chaan aahe he mla aavdal, actually ajunahi as kontya na kontya gavat hot tya chulincha dhur khup gharatun nighto, pn mala ek sangavese vatate ki aata choriche sylender used kartat kaaran mahina mahina tyanchykade gas nasto tari te chukiche aahe manya karte.
कविता
धन्यवाद.. संस्कृती मधे बदल हा होतच असतो, आणि तो सहज पणे स्विकारला पण जातो .
kaka abhi Induction cook top use karneka!!!!!
गुरु,
अरे त्याला पण इलेक्ट्रिक पॉवर लागतेच ना..
तो पितळी कुकर मी पण बघितलाय … पण रिटायर झालेला. आईकडे साखर ठेवायला तोच वापरला जायचा कित्येक वर्षं!:) आणि कोळशाची शेगडी, स्टोव्हचे वेगवेगळे प्रकार पण वापरलेले बघितलेत. मनात येताक्षणी पेटाणारा, आच कमी जास्त करता येणारा गॅस म्हणजे फार मोठं सुख आहे त्या सगळ्या प्रकारांनंतर. शेवटाचं वाक्य वाचून म्हणणार होते, सामान्यांनी बहुतेक आता हवा खाऊन रहायचंय … पण ते शक्य नाही. प्रदुषण फार आहे!
गौरी
चला, कोणीतरी निघालं ह्या प्रकाराची माहिती असलेले. आमच्याघरची पितळी भांडी सगळी मोडीत गेलॊ. कारण कल्हईवाल्याचा हल्ली कुठे पत्ताच नसतो. आधी माळ्यावर, आणि नंतर मग मोडीमध्ये..
स्वत:वरच राग काढण्याव्यतिरिक्त आपल्या हाता फ़ारसं काहीच राहीलेलं आहे असं वाटत नाही. कारण आपण सद्ध्या तरी तेवढं करु शकतो.
विशाल
आपण काहीच करू शकत नाही, ह्यामुळेच तर वैफल्य येतं.
स्वत:वरच राग काढण्याव्यतिरिक्त आपल्या हाता फ़ारसं काहीच राहीलेलं आहे असं वाटत नाही. कारण आपण सद्ध्या तरी तेवढं करु शकतो
चारुहास,
याची जाणीव होणं महत्वाचे आहे. जर तुम्हाला माहितीच नसले की तुमच्यावर अन्याय होतोय, तर तुम्ही पेटून ऊठणार तरी कसे??
लोक भ्रष्टाचार, महागाई विरुद्ध टीका करतात. काही दिवसांनी ते विसरून पुन्हा संसाराच्या रहाटगाड्यात अडकतात.
कॉंग्रेस सरकार हे पुरते ओळखून आहे. त्यामुळे ते घोटाळे करतात. कारवाया करण्याचा बाता मारतात. काही काळाने लोकही विसरून जातात.
कधीतरी लोकांच्या मनातील या ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा असे मनापासून वाटते.
सागर
समाजाची आठवणीची क्षमता फारच कमी असते, आणि मह्णूनच तर या राजकीय नेत्यांचं फावतं.
“आग लागो” ह्यांच्या तोंडाला असे म्हणायची पण सोय राहिलेली नाही. आग लावाण्यासाठी सामग्रीच शिल्लक नाही. बहुतेक सकाळी सकाळी बहिर्गोल भिंग घेऊन सूर्यप्रकाशात जेवण शिजवायला लागणार…
right sidharth
सिद्धार्थ,
माझ्या नजरेपुढे मी स्वतः आलोय , एक बहिर्गोल भिंग घेऊन बसलेलो..
लेई भारी ,मस्त,सुरेख.परत चूल येणार का?पण वेळ नाही ना.लहानपणीच्या गोष्टीना आपण उजळा दिला .मस्त छान वाटले
महेश
धन्यवाद.. काही आठवणी मनात खूप खोलवर दडलेल्या असतात, कधी तरी अशा उफाळून बाहेर येतात.
jyacha bolun upyog nahi tya goshti bolu nahit, gas fakt 6 ch milnar n etc.
udhya he hi visrle jail 2 rich bhavvadh yeil mag navin post ya shivay aapan kai karnar na?
मीना,
बोलणे एवढेच तर आपल्या हाती आहे, बोलण्यावर बंदी म्हणजे पुन्हा आणिबाणी
marathi madhye kase type karata yeil
Type in Marathi – Google Transliteration.mht मध्ये जाऊन तुम्ही मराठी type करू शकता
thank u
Ajun ek chhan lekh.. Junya aathavani ani shewati dilele shal joditale.. Mastach..
रघू
धन्यवाद.
Congress च्या भ्रष्टाचारी नेत्यांचा पैसा काढा आधी बाहेर. खूप फरक पडेल . सामन्याचे असे हाल करायची गरज पडणार नाही.
This is awesome post. i like u r post. gr8 u r writing is very nice.
Thanks Nitin.
महेन्द्र काका नमस्कार ,
मी पहिल्यांदाच तुमच्या पोस्ट ला रिप्लाय करतो आहे ……
खूप अप्रतिम लिहिता तुम्ही……आणि हि पोस्ट पण खुपच मामिर्क लिहिली आहे ……!!!!!
सर्व सामान्य माणसांनी खरच काय करायचे हा प्रश्न खूप अवघड आहे …..:(
पिनाक
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
सुधारणा होतच असतात आपण त्यांना रोखू शकत नाही.प्रत्येक गोष्टींचे बुरे आणि भले असे दोन्ही परिणाम असतात त्यातल्या बुऱ्या पासून आपण पळ नाही काढू शकत.
As usual mast post….. Baryach junya upkarnanchi olakh zali…nahitari majhya pidhine jastit jast stove anubhavlela… Chaan maja aali..
सही.अप्रतिम
धन्यवाद महेश.
काका… जुन्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवल्या… अस्मादिकांचा जन्म गिरगावातला.. त्यात काही वर्ष ओल्ड स्टाईल लाकडी चाळीत गेलेली.. त्यामुळे.. कल्हईवाले…वैगरे पाहिलेले आठवतात… स्टोव ची पिन… तो काकडा… पितळेची भांडी.. दुपारचे तीन चार ची चहाची वेळ झाली कि घरोघरी ऐकु येणारे स्टोव्हचे आवाज…
हरवून गेलो खरंच… आयुष्यं खरंच किती सोप्पं आणि सुंदर होतं तेव्हा…
तेव्हाच्या चुलीवरच्या जेवणाची आणि मडक्यातल्या पाण्याची चव… आत्ताच्या गॅसवरच्या जेवणाला आणि फ्रीज मधल्या पाण्याला कुठे…??
बाकी आम्ही निदान एवढं तरी पाहिलंय… या नंतरच्या जनरेशन ला तर या सर्व गोष्टी फोटोत ही पाहायला मिळणं कठीण आहे…!!
प्रसाद,
नवीन पिढीला हे कदाचित कधी पहायलाही मिळायचं नाही, चेंज इज इनएव्हीटेबल असे म्हणतात ना, ते अगदी खरं आहे हे पटतं.